
…तर संपूर्ण कोकणचे अस्तित्व धोक्यात!
रत्नागिरी: जागतिक हवामान बदल, वाढते प्रदूषण हा आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंतेचा विषय ठरला आहे. अशातच आता माजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक आणि माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण किनारपट्टीच्या पर्यावरण संतुलन याबाबत चिंता व्यक्त केली आहे. येत्या काळात ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका कोकण किनारपट्टीला सहन करावा लागू शकतो. किनारपट्टीवरील गावे, शहरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली आहे.
‘पुढील काळाचा विचार करता जगाला मोठा धोका ग्लोबल वॉर्मिंगचा आहे. याचा सर्वाधिक फटका जाभरातील किनारपट्टीवरील भागाला बसणार आहे. याचा विचार करता कोकणात किनारपट्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल. पर्यावरणीय बदलामुळे समुद्राची पातळी वाढणार आहे. असे झाल्यास किनार्यावरील गावे, शहरे यांचे अस्तित्वच धोक्यात येईल’, असा इशारा सुरेश प्रभू यांनी दिला.
मालवण हे थेट किनाऱ्यावर वसले आहे. समुद्राची पातळी वाढल्यास शहरात पाणी घुसून अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. पर्यावरणीय बदलांचे परिणाम हे कल्पनेपलिकडे वेगवान आणि गंभीर आहेत. पूर्वी आपण म्हणायचो, की वादळांचा धोका पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल यांनाच जास्त आहे. पण आता पश्चिम किनारपट्टीवरही वादळे येऊ लागली आहेत,’ असे सुरेश प्रभू म्हणाले.
‘ग्लोबल वॉर्मिंग’चे गंभीर दुष्परिणाम पाहता पुढच्या काळात कोकणातील किनारपट्टीवरील शहरे, गावे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. येथील अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या शेती, बागायती, मासेमारी आणि या सर्वांसह पर्यावरणावर आधारित पर्यटन यालाही मोठा धोका असेल. याला तोंड देण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, असे ते त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
‘पर्यावरण बदलाचा कोकणच्या अर्थव्यवस्थेवरही आणखी गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. येथील अर्थकारण शेती, बागावती, मासेमारी आणि पर्यटन या चार घटकांवर अवलंबून आहे. चारही घटक कोकणच्या वैशिष्ट्यांवर अर्थात येथील पर्यावरणावर अवलंबून आहेत. यालाच धोका निर्माण झाल्यास त्या घटकांचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते,’ असे ते म्हणाले.
‘येथील आंबा, काजूवर हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसू लागला आहे. यंदाही थंडीच्या प्रमाणामध्ये अनियमितता निर्माण झाली. याचा थेट परिणामही आंबा, काजूच्या मोहोरावर दिसत आहे. पुढील 15 वर्षांचा विचार करता ही स्थिती खूपच गंभीर झालेली असेल’, अशी चिंता प्रभू यांनी यावेळी व्यक्त केली आहे.