
पर्यटन वृद्धीसाठी कोकण ‘डेस्टिनेशन’ चा होणार आराखडा
रत्नागिरी :कोकणचे पर्यटन सध्या केवळ समुद्रकिनार्यापुरते मर्यादित राहिले आहे. मात्र, येथील गड-दुर्ग, मंदिरे, पर्यटन गावे, तलाव, खाड्या, बंदरे, लोककला, कोकणी बाजारपेठांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने पाहिले जात नाही. आता यात कातळशिल्पांची भर पडली आहे. ही ठिकाणे देखील विकसित केल्यास ती देशी व परदेशी पर्यटकांची आकर्षण केंद्रे होऊ शकतात. शासनाने नेमलेली डेस्टिनेशन मॅनेजमेंट कमिटी या दृष्टीने संपूर्ण कोकण हे ‘डेस्टिनेशन’ म्हणून आगामी काळात विकसित होण्यासाठी आराखडा तयार करीत आहे.
ज्यासाठी पर्यटक जगभर फिरतात ते डोंगर, हिल स्टेशन, समुदकिनारे, बॅकवॉटर, जंगले, धबधबे, हेरिटेज, किल्ले, संस्कृती, लोककला सर्व काही कोकणात केवळ 60 ते 70 कि. मी. मध्ये आहे. कोकण पर्यटनाची सुनियोजित प्रसिद्धी केली, जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून गावागावात निर्माण केल्यास कोट्यवधी पर्यटक कोकणात येऊ शकतील.
कोकण हा कृषीच्या दृष्टीने सर्वात समृद्ध आहे. हापूसची 1000 कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल आहे. शेतकर्यांना योग्य माकेर्टिंग, तंत्रज्ञान, प्रशिक्षणाची जोड दिली तर ही अर्थव्यवस्था प्रचंड वाढू शकते. नारळ, मसाले, काजू, कोकम, केळी, अननस, वनौषधी अशी श्रीमंत पिके ही कोकणची ओखळ आहेत. कृषी व पर्यटन हे कोकण डेस्टिनेशनच्या आराखड्यात समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच कातळशल्पांनाही डेस्टिनेशन आराखड्यात स्थान देताना कोकणातील कातळशिल्पांना युनोस्कोच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कातळशिल्पांना या आराखड्यात प्राधान्य देताना अनभिज्ञ असलेला कोकणातील हा ठेवा खुला करण्यासाठी या क्षेत्रातील काही तज्ज्ञांचेही आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य घेण्याच्या सूचना प्रशासनांना करण्यात आल्या आहेत.
सागरी पर्यटन, डॉल्फिन सफारी, स्नॉर्कलिंग, बीच टुरिझम, बॅकवॉटर टुरिझम, कृषी व ग्रामीण पर्यटन, सह्यादीतील इको टुरिझम, अॅडव्हेंचर टुरिझम, जंगल सफारी असे रोजगार निर्माण करणार्या नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी या आराखाड्यात प्राधान्य देण्यात येणार आहे.