
गणपतीपुळेच्या समुद्र किनारी सांडपाणी सोडल्याने आरोग्याला धोका
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणारे गणपतीपुळे गावामध्ये अगदी मंदिरा नजीकच सांडपाणी सोडल्याने पर्यटक भक्तां मधून नाराजीचे सूर उमटत आहेत.
गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी जगप्रसिद्ध आहे. या क्षेत्राला दिवाळी, नाताळ,हे महिना अशा शालेय सुट्ट्यांच्या वेळी लाखो भाविक पर्यटक भेद देत असतात. इतर वेळी शनिवार, रविवार व सलग जर सुट्ट्या आल्या तर गर्दी पहावयास मिळते.
मात्र सध्या राजरोसपणे सांडपाणी समुद्र चौपाटीवर सोडले असून गेले अनेक महिने हे पाणी या ठिकाणी वाहत असल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले.
हे पाणी ज्या ठिकाणाहून समुद्रकिनारी वाहते त्याच्याबरोबर वरच्या बाजूस संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे सांडपाण्याचे चेंबर शासकीय विश्रामगृहाजवळ समोर पहावयास मिळत आहे. आणि सद्यस्थितीत येणाऱ्या भक्त पर्यटकांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही याची काळजी संस्थान श्री देव गणपतीपुळे यांनी घ्यावी असे मत काही जाणकार ग्रामस्थांमधून होत आहे.
गणपतीपुळेला येणाऱ्या पर्यटकांच्या , भक्तांच्या तसेच समुद्र चौपाटीवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांच्या आरोग्या विषयी काळजी घेत सदर समुद्राच्या चौपाटीवर सोडलेल्या सांडपाण्याकडे लक्ष घालून त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढावा असे मत स्थानिक ग्रामस्थ; भक्तगण व पर्यटकांकडून केली जात आहे.