
रत्नागिरीतील रस्ते कॉंक्रीटीकरण व कंत्राटावरून मनसेने ओढले ताशेरे
रत्नागिरी :मागील महिन्यात रत्नागिरीत १२२ कोटी रुपयांचा विकासकामांचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते झाले, या विकासकामांमध्ये काही दिवसांपासून सुरू झालेल्या रस्ते कॉंक्रीटीकरणावरून मनसेने आज सत्ताधारी व अधिकाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले व अनेक प्रश्न उपस्थित केले. जवळपास ९७ कोटी मूल्य असणाऱ्या या कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी ८२.४४९ कोटी निधी हा राज्य सरकार च्या नगरोत्थान योजनेतून तर १४.५५ कोटी रुपये निधी रत्नागिरी नगरपरिषदेला उभे करायचे असून ते कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत यावर बोलताना मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी नगरपरिषदेकडे कंत्राटी कामगारांचे पगार वेळेवर द्यायला पैसे नसताना नगरपरिषद हा कर्जाचा बोजा उचलत आहे यावर आश्चर्य व्यक्त केले तसेच रत्नागिरी शहरातील सतत निकृष्ट होणारे याआधीचे डांबरी रस्ते बांधण्याचे, रस्ते दुरूस्तीचे व आत्ताचे रस्ते कॉंक्रिटीकरण या सर्वांचे काम आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन या कंपनीलाच कसे मिळते? इतर कंत्राटदार याला पात्र का होऊ शकत नाही? हे सत्ताधारी व अधिकारी यांच्या संगनमताने होत आहे का? असा सवाल उपस्थित करताना आत्ताच्या राज्य सरकार चे ब्रीदवाक्य ‘सरकार आपल्या दारी’ आहे मात्र रत्नागिरीत ‘टेंडर आपल्या घरी’ असेच चित्र दिसून येत आहे असे म्हणत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.यावेळी कॉंक्रिटीकरण करण्या आधी करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या निकृष्ट दर्जावर ही त्यांनी टिका केली व कॉंक्रीटीकरण झाल्यावर दुभाजकांची उंची कमी झाल्यामुळे त्यासाठी पुन्हा नवीन निविदा निघणार त्यामुळे आनंदी आनंद च आहे असे म्हणत या सर्व गोष्टींचा विचार करता रत्नागिरीकरांनी सजग होत येणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य पर्याय निवडावा असे आवाहन केले.
यावेळी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहरसचिव अजिंक्य केसरकर, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, मनसे रस्ते आस्थापना शहर संघटक सुशांत घडशी आदी महाराष्ट्रसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.