
रत्नागिरी शहरात होणारी विकासकामे चुकीच्या पद्धतीने, जनतेच्या पैशाचा चुराडा : मिलिंद किर
रत्नागिरी :नगराध्यक्ष असताना रत्नागिरी शहर विकास आराखडा बनवल्याने नवीन पाणी योजनेसह रस्ता काँक्रिटीकरणाला शासनाकडून निधी मिळाला आहे. परंतु, चुकीच्या पद्धतीने कामे केली जात असल्याने रत्नागिरीकरांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष मिलिंद कीर यांनी केला.
मोठमोठ्या विकासकामांच्या निधीत रत्नागिरी नगर परिषदेला स्वत:चा 15 टक्के हिस्सा भरावा लागतो. सध्या नगर परिषद याच कारणांमुळे 70 ते 75 कोटी रूपये कर्जबाजारी आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या नगर परिषदेने 100 कोटी रूपये खर्चाच्या रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी स्वत:चा 15 टक्के हिस्सा भरण्यासाठी कर्ज काढले आहे. कर्जबाजारी असलेल्या रनपला पत नसताना बँकेने कर्ज कसे दिले? असा सवालही मिलिंद कीर यांनी यावेळी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, शहराध्यक्ष निलेश भोसले, माजी नगरसेवक सईद पावसकर उपस्थित होते.
रत्नागिरी शहराची 69 कोटी रूपयांची नळपाणी योजना पूर्णत्वास गेलेली नाही. नवीन 100 कोटी रूपये खर्चाच्या काँक्रिटीकरण कामावेळी नवीन पाणी योजनेची रस्त्यामधून गेलेली जलवाहिनी काढून रस्त्याच्या कडेला टाकावी लागणार आहे. त्यामुळे हा खर्चसुद्धा वाया जाणार आहे. वर्षभरापूर्वी डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. डांबरीकरण झालेल्या रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीची मुदत संपण्यापूर्वीच त्याच रस्त्यांवर काँक्रिटीकरण कशाला? असा सवालही उपस्थित केला.
पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी अनेक विकासकामांची भूमिपूजने केली. त्यामध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन झाले आहे. हे काम करताना रत्नागिरी नगर परिषदेच्या कार्यपद्धतीत अनियमितता असून, शासनाच्या अटीशर्थींचेही उल्लंघन झाले असल्याचे उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी सांगितले. रस्ता डांबरीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. याप्रकरणी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.