
जिल्ह्यातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्र होणार अपग्रेड
रत्नागिरी :ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेड करण्यात येणार आहेत. तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय वैद्यकीय विद्यालयाचे फित कापून आणि कोनशिला अनावरण करून लोकार्पण केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्याचा आढावा घेतला. काही सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या द़ृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रूग्णालये उभारण्यात येत आहेत, असे सांगितले.
राज्यात सध्या आरोग्याचा कायापालट करण्याचे काम सुरू झाले आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आणि वर्षभरात त्याचा शुभारंभही करण्यात आला. 430 खाटांचे जिल्हा रूग्णालय स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत 400 ठिकाणी हे दवाखाने सुरू आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य यंत्रणेची रक्कम 5 लाखांवर वाढवली आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना सांगितले.
ग्रामीण भागातील जनतेने पहिले उपचार हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दिले जातात. हे पहिले उपचार चांगले मिळाले तर रूग्णांना पुढे जाण्याचीच आवश्यकता नसते. सांगलीत त्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेड करण्याचे काम तेथील जिल्हाधिकार्यांनी सुरु केले आहे. रत्नागिरी जिल्हाधिकार्यांनी हे काम हाती घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यामुळे आता जिल्ह्यातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच अपग्रेड पहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.