
विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेसाठी सर्व विभागांनी नियोजन करा: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- भारत सरकारच्या फ्लॕगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधित पार पडणार आहे. ही मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे आज बैठक झाली. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांनी सर्वांचे स्वागत करुन या मोहिमेविषयी माहिती दिली.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, शहरी आणि नागरी अशा दोन्ही लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी निवड करावी. शासन ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाही, अशांना या योजनेत समावेश करुन घेणे, त्यांना लाभ देणे, नव्याने लाभार्थी करुन फायदा देणे आदी प्रमुख उद्देश या मोहिमेचा आहे. त्यासाठी विभागप्रमुखांनी आपल्यास्तरावर बैठक घेवून नियोजन करावे. या मोहिमेचा प्रचार, प्रसिद्धी करुन जनृजागृतीही करावी, असेही ते म्हणाले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ अनिरुध्द आठल्ये, प्रांताधिकारी राजश्री मोरे, आकाश लिगाडे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. प्रभारी तहसिलदार (सर्वसाधारण) रविंद्र सुवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे हे उपस्थित होते.