
दुचाकी बाजूला केल्याच्या रागातून मारहाण
रत्नागिरी: दुचाकी बाजूला केल्याच्या या रागातून मारहाण करणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असलम मोहमंद बारगीर, सुफियान असलम बारगीर अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. २३) सकाळी रेहमत मोहल्ला साखरतर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत दुचाकी ही संशयित असलम बारगीर यांनी उचलून बाजूला केली. त्या वेळी फिर्यादी यांचे पती शाहरूख यांनी असलम बारगीर यास गाडी उचलून पाहिलेस, गार्ड मोडलास, आता हॅण्डल तोडतोस काय? असे विचारले.त्यावरून दोघांची झटापट झाली. त्या वेळी सुफियान बारगीर हातात सळई घेऊन आला व फिर्यादी व त्यांचे पती शाहरूख यांच्या नाकावर, पाठीवर, हाताच्या कोपऱ्यावर मारून दुखापत केली. फिर्यादी महिला सोडवण्यासाठी गेल्या असता असलम व सुफियान बारगीर यांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.