
रेशनकार्ड धारकांना दर महिन्याला धान्य उचल करणे बंधनकारक
रत्नागिरी :केंद्र शासनाने धान्य नेण्यासाठी पॉस मशिनवरील मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी चालू महिन्यातील धान्य न घेतल्यास ते पुढे मिळणार नाही. परिणामी, रेशनकार्डधारकांना दर महिन्याला धान्याची उचल करावीच लागणार आहे. या सूचना जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत. धान्यातील काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थींना दर महिन्याला मिळणारे रेशन वेळेवर उचलले गेले नाहीतर पुढील महिन्यात ते रेशन उचलता येत होते. त्यामुळे धान्य शिल्लक राहात होते. ते परत कसे द्यायचे आणि लाभार्थींना कसे वितरित करायचे, हा प्रश्न दुकानदारांपुढे निर्माण होत होता. मात्र आता नवीन निर्णयानुसार, त्या महिन्याचे रेशन त्याच महिन्यात उचलणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे झाले नाही तर त्यांचे रेशन परत जाईल आणि पुढील महिन्यात ते मिळणार नाही. त्यामुळे रेशन शिल्लक राहण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. आतापर्यंत त्या महिन्याचे धान्य पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत रेशन दुकानावरून घेता येत असे, परंतु आता त्या त्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंतच धान्य घ्यावे लागणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 4 लाख 21 हजार 594 कार्डधारक आहेत. तर श्वेत कार्डधारकांची संख्या 44 हजार 583 इतकी आहे. एपीएल कार्डधारकांची संख्या 1 लाख 1 हजार 50 असून प्राधान्य गटात 2 लाख 37 हजार 439, अंत्योदय कार्डधारकांची संख्या 38 हजार 522 इतकी आहे.