
उन्नत’साठी राजापूरची निवड; 22 गावांचा सहभाग
राजापूर: गावपातळीवरील दैनंदिन जीवनावर परिणाम करणार्या समस्यांसह विविध सामाजिक व विकासाशी संबंधित प्रश्नांची संशोधनाद्वारे उकल करून त्यावर अचूक उपाययोजना शोधण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे उन्नत महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानासाठी राजापूर तालुक्याची निवड झाली आहे.
राज्य शासन आणि आयआयटी मुंबई यांच्यामार्फत राबवण्यात येत असलेल्या या सर्व्हेक्षणामध्ये तालुक्यातील पहिल्या टप्प्यामध्ये दहा गावांमध्ये रस्ते आणि पाणी या मुद्द्यान्वये सर्व्हेक्षण केले जात आहे. या अभियानांतर्गत अभ्यास अन् संशोधनाद्वारे तयार करण्यात येणारा अहवाल वा अभ्यासप्रकल्प विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी करण्यासाठी वा गावामध्ये एखादा विकास प्रकल्प राबवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
त्याचवेळी लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणार्या समस्यांची उकल करून त्या सोडवणे, पायाभूत सुविधांची उभारणी करणे आणि गावच्या भविष्यातील विकासासाठी दिशादर्शक म्हणूनच उपयुक्त ठरणार आहे. स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या संधी काय असू शकतात याचे काही प्रमाणात मार्गदर्शन या अभ्यासातून होणार आहे.
राजेंद्र बाईत, राजापूर
उन्नत महाराष्ट्र अभियानअंतर्गत राज्य शासन आणि आयआयटी मुंबई यांच्यामार्फत केस स्टडी पद्धतीने हा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांसह महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जात आहे. ‘आपले प्रश्न, आपले विज्ञान’ या उपक्रमांतर्गत हा अभ्यास केला जात असून गावागावातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकांशी थेट संवाद साधून सखोल अन् सविस्तर संशोधन केले जाणार आहे.
भविष्याचा वेध घेऊन अभ्यास अहवाल वा प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असून, हा अभ्यास प्रकल्प अहवाल शासनासह पंचायत समिती आणि संबंधित ग्रामपंचायतीकडेही राहणार आहे. विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार केले जाणार आहेत जेणेकरून, काही विषयांची उकल होण्यास आणि त्याद्वारे ती समस्या सोडवून गावविकास साधण्यास मदत होईल.
या विषयांवर केस स्टडी
स्थानिक शेती, उपलब्ध पाणी, ग्रामीण वाहतूक
ग्रामीण शिक्षण, गावपातळीवरील आरोग्य, गावागावातील स्वच्छता, गावातील लघुउद्योग, स्थानिक पर्यावरण, सार्वजनिक व्यवस्था, पायाभूत सुविधा, रोजगार संधी
सरपंच, ग्रामसेवक, प्राध्यापकांची कार्यशाळा
उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गत राजापूर तालुक्यामध्ये प्रत्यक्ष संशोधन वा सर्व्हेक्षण करण्याच्या अनुषंगाने राजापूर येथे गतवर्षी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा पार पडली. यामध्ये या अभियानासह नेमके कशा पद्धतीने आणि कोणत्या मुद्द्यान्वये केस स्टडी होणार आहे, त्याचा भविष्यामध्ये गावविकासासाठी कसा उपयोग होणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यापूर्वी, केस स्टडीसह संशोधनामध्ये सहभागी होण्याच्या उद्देशाने विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांची रत्नागिरी येथेही कार्यशाळा पार पडली होती. त्यामध्ये अनेक नामवंत महाविद्यालयातील प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यांनी या प्रकल्पासंबंधित आणि सर्व्हेक्षणासंबंधित सविस्तर माहिती जाणून घेतली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गत गावोगावच्या संशोधनामध्ये वा केस स्टडीमध्ये सहभागी होणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकांशी संवाद साधून विविध समस्यांची उकल करण्याची अन् अभ्यासण्याची जवळून संधी मिळणार आहे. त्यामुळे केस स्टडीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. मात्र, पहिल्या टप्प्यातील निवड झालेल्या गावांमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश झालेला नव्हता. मात्र, पाण्यासंबंधित जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये झालेल्या सर्व्हेक्षणात त्यांचा समावेश करण्यात आला होता.
केस स्टडी होत असलेली गावे
नाटे, दळे, अणसुरे, ताम्हाणे, जुवाठी, कशेळी, भू, झर्ये, आंगले, केळवली
असे झाले रस्ता सुविधेचे सर्व्हेक्षण
निवड केलेल्या गावांमधील रस्ता सुविधेसंबंधित अहवाल तयार करण्यासाठी संबंधित गावामध्ये जाऊन मुख्य रस्ता आणि वाडीवस्त्यांना जोडणारे जोडरस्ते आणि त्यांचा दर्जा याची पाहणी करण्यात आली. संबंधित रस्त्यावर किती वेगाने वाहन पळू शकते, या आधारावर रस्त्यांची पाहणी वा सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यासाठी ए पन्नास कि.मी. पेक्षा जास्त वेग, बी 35 कि.मी. वेग, सी ः वीस ते पस्तीस कि.मी. वेग, डी वीस कि. मी. पेक्षा कमी वेग, ई डांबरीकरण नाही; पण कच्चा रस्ता, एफ रस्ता नाही असे गट करण्यात आले.
यानुसार सर्व्हेक्षण करताना या रस्त्यांची लांबी, रूंदी यांसह त्यांवर आधारित वा जोडणार्या वाड्या आणि लोकसंख्या यांचीही नोंद करण्यात आली. त्याच्या जोडीने रस्त्याची सद्यःस्थिती वा दर्जा काय आहे? भविष्यामध्ये या रस्त्यांची कामे करायची झाल्यास त्यावर अपेक्षित निधी किती आहे याचाही अभ्यासही करण्यात आला. त्यानंतर, संकलित केलेल्या डाटाच्या साहाय्याने या गावच्या रस्त्यांचे नकाशे तयार करण्यात आले आहे. भविष्यामध्ये रस्त्यांची कामे करणे, आराखडे तयार करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत.
रस्त्यावर खर्च झालेल्या नोंदीचा अभाव
गावातील मुख्य रस्त्यासह जोडरस्त्यांची माहिती घेताना या रस्त्यांवर आजपर्यंत शासकीय वा ग्रामपंचायत फंडातून निधी खर्च करण्यात आला आहे का? झालेला असल्यास कोणकोणत्या योजनांमधून निधी खर्च झाला आहे, याची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेण्यात आली. मात्र, ही माहिती कुठल्या एकाच कार्यालयात सलगपणे अन् सहजपणे उपलब्ध नाही. गावातल्या रस्त्यांवर झालेल्या कामांची व खर्चाची माहिती ही एकाच ठिकाणी वर्गीकृत स्वरूपात उपलब्ध व्हावी या अनुषंगाने आयआयटी मुंबईतर्फे माहिती संकलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सार्वजनिक मालमत्तांच्याही नोंदी
रस्ते वा पाणीपुरवठ्याचे सर्व्हेक्षण करताना गावातील सार्वजनिक मालमत्तेच्या नोंदीही करताना लोकेशन ट्रॅक करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संबंधित सार्वजनिक मालमत्तेचे लोकेशन घेऊन जीपीएस लॉगर ऑन ठेवून त्याचे ट्रॅक घेण्यात आले. या सार्वजनिक मालमत्तांमध्ये ग्रामपंचायत इमारत, शाळा, दुकाने, स्मशानभूमी आदींचा समावेश आहे.