
तात्पुरत्या व्यवस्थेसाठीही चार दिवस प्रतीक्षा
रत्नागिरी:- शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ येथील जॅकवेल कोसळल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पालिकेकडून पर्यायी व्यवस्था सुरू आहे. नव्या जॅकवेलमध्ये बसविण्यात आलेले २५० एचपीच्या नवीन दोन पंपांपर्यंत पाणी आणण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या पंपांना आवश्यक पाण्यासाठी नदीत दोन पाण्यातील पंप टाकून पाणी उचलले जाणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या पाणी व्यवस्थेसाठी आणखी ४ दिवस लागणार आहे. सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी २० ते २५ दिवस लागणार असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.
शीळमध्ये प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असता ही वस्तुस्थिती समोर आली आहे. सुधारित नळ पाणी योजनेतीलच हे काम असल्यान अन्वी कंपनीची टीम अहोरात्र काम करत आहे. त्याला पालिकेच्या पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मोठे पाठबळ आहे. पालिका मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित सर्वजण शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत. जुनी जॅकवेल आणखी खचली असून ते कधीही विहिरीत कोसळणार आहे. त्यामुळे नंतर ही विहिर साफ करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. या जॅकवेलमध्ये अडकलेले २५० अश्वशक्तीचे तीन पंप काढण्याचा कर्मचाऱ्यांनी अटोकाट प्रयत्न केला. परंतु ते शक्य झालेले नाही. जॅकवेल अजून खचत असल्याने तेथे काम करणे तेवढेच धोकादायक आहे. पालिकेने संपुर्ण विद्युत पुरवठा खंडित केला आहे.
पाणी योजनेतील नवीन जॅकवेलचे काम झाले असले तरी त्याठिकाणी विद्युत पंप जोडले नव्हते. या जॅकवेलच्या खालीही मोठी टाकी आहे. चार दिवसांमध्ये आणखी दोन नवीन अत्याधुनिक २५० अश्वशक्तीचे विद्युत पंप बसविले आहेत. परंतु या पंपापर्यंत पाणी आणण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेसीबीने चर खोदले जात आहेत. जुन्या जॅकवलेच्या पुढे दोन पाण्यातील सबमर्सिबल पंप बसवून हे पाणी नवीन जॅकवेलच्या टाकीत टाकले जाणार आहे. त्यानंतर हे पाणी जॅकवेलमधील पंपाने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रात येणार आहे. परंतु या कामाला अजून बराच अवधी आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी आठवडा जाण्याची शक्यता आहे. पालिकेने एमआयडीसीकडून पाणी घेऊन आणि टॅंकरद्वारे साठवण टाक्यांमध्ये पाणी टाकून पाणी पुरवठा केला जात आहे.