
जिल्ह्याच्या खरीप पेरणी क्षेत्रात १५ हजार ७०० हेक्टरची घट
रत्नागिरी :नुकत्याच झालेल्या पिक पाहणी अहवालानुसार जिल्हयात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र 55 हजार 271 हेक्टर इतकेच भरले आहे. खरिप हंगामामध्ये जिल्ह्यात दरवर्षी 71 हजार हेक्टरपर्यंत प्रत्यक्ष पेरणी केली जाते. यंदा त्यात सुमारे 15 हजार 700 हेक्टरची घट झाली आहे. ई-पिक पाहणीची नोंद करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मूदत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यात काही अंशी वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मोबाईल अॅपच्या साह्याने ई-पीक पाहणी करण्याचा निर्णय राज्यस्तरावर घेण्यात आला होता. त्यानुसार यावर्षी महसूल आणि कृषी विभागाकडून याबाबत जोरदार प्रचार, प्रसार करण्यात येत आहे. कृषी विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यात गावस्तरावर नियोजन केले होते. यामध्ये शेतकर्यांना तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सातबार्यावर विविध पिकांची नोंदणी करता येते. महसूल विभागाचा ई- पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत राज्यातील सुमारे 1 कोटी 88 लाखापेक्षा अधिक शेतकर्यांनी नोंदणी केली गेली. यंदाच्या खरीप हंगामात ई-पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. यंदा खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी 1 जुलै 2023 पासून सुरू करण्यात आली. रत्नागिरी जिल्हयातील तालुकानिहाय प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र 55 हजार 271 हेक्टर असून इ-पिक पाहणी झालेले क्षेत्र साधारण 3.50 टक्के आहे. पीक पाहणीचा अहवाल तालुकास्तरावर तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या सहीने जिल्हास्तरावर पाठविला जातो. महसूल आणि कृषी यांनी आपापल्यास्तरावर केलेल्या सर्व्हेक्षणात मोठी तफावत आढळली होती. ही तफावत दूर करण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून कृषी विभागाला प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या अहवालात दरवर्षीच्या तुलनेत प्रत्यक्ष पिक पेरणी झालेल्या क्षेत्रात 15 हजार 729 हेक्टरची तुट दिसून येते. कोरोना कालावधीत प्रत्यक्ष पेरणीतील क्षेत्र वाढलेले होते. त्यानंतर तिन वर्षांनी मोठी घट झाल्याने शेतीकडील जिल्ह्यातील लोकांचा कल मोठ्याप्रमाणात कमी होत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.