
महिला आरक्षण विधेयकाचे रत्नागिरी मध्ये जल्लोषात स्वागत
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन संसद भवनातील कामकाजाचा श्रीगणेशा केला. मोदी सरकारच्या या घोषणेनंतर सर्वत्र या विधेयकाचे स्वागत होत असून रत्नागिरीत सुद्धा याचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले.
‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हे १९ सप्टेंबर २०२३ रोजी नव्या संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्याची सरकारची तयारी आहे. यामुळे महिलांना हक्काचे स्थान राजकारणात मिळणार असल्याने या विधेयकाचे विरोधकांसह सर्वानीच स्वागत केले आहे. भाजपा दक्षिण रत्नागिरी महिला मोर्चाच्या अध्यक्षा ऐश्वर्या जठार यांनीही रत्नागिरीतील महिलांच्या वतीने या विधेयकाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून त्यांच्यामुळे महिलांना मोठा सन्मान मिळाला असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी रत्नागिरी शहर येथे मारुती मंदिर येथे भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचे घोषणा देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी संपदा तळेकर, पल्लवी पाटील, वर्षा ढेकणे, राधा हेळेकर, सौ. ढेकणे व अन्य भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.