
कोकणातील पाणथळ जागांचे होणार सर्वेक्षण
रत्नागिरी :कोकणातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे ठरवले आहे. कोकणातील पाणथळ जागांचे सर्वेक्षण केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे अहवाल वर्षभरात पाणथळ प्राधिकरणासमोर ठेवण्यात येणार आहे.
पाणथळ जागांचे संरक्षण करण्यात येत असून अशा जागांना रामसर दर्जा देण्यात येतो. महाराष्ट्रात नांदूर – माध्यमेश्वर (नाशिक), लोणार सरोवर (बुलडाणा), ठाणे खाडी असे तीन रामसर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. राज्यात सुमारे सव्वा दोन हेक्टर क्षेत्रात 23 हजार पाणथळ जागा असून त्यांचे सर्वेक्षण मान्यता प्राप्त संस्थेकडून करून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. यामध्ये कोकणातील पाणथळ जागांचाही समावेश आहे.
जिल्हाधिकार्यांनी या कामाला प्राधान्य देत आपल्या जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती संबंधित संस्थेच्या मदतीने वर्षभरात संकलित करावी, अशा सूचना पाणथळ प्राधिकरणाने केल्या आहेत. समुद्र किनार्यांच्या रक्षणासाठी कांदळवनांचे महत्त्व लक्षात घेता, त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
विशेषत: खासगी जमिनीवरील कांदळवनांच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रभावीपणे सनियंत्रण करण्यात येणार आहे, तशा सूचना देण्यात आल्या आहेत. खारफुटीची जंगले नष्ट करणार्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्याच्या सूचनाही पाणथळ प्राधिकरणाने जारी केल्या आहेत.