
जिल्ह्यातील भाताचे उत्पादन पाच टक्क्यांनी घटण्याची भीती
कृषी विभाग ; पाण्याअभावी भात रोपं पडली पिवळी
रत्नागिरी :सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात उत्पादन यंदा 5 टक्केने घटण्याची शक्यता जिल्हा कृषी विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अनियमित पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून भविष्यात असेच चित्र राहिले तर त्यात आणखी वाढ होईल असे तज्ज्ञांचे मत आहे.
पाण्याअभावी भात रोपांना अधिकचे फुटवे आलेले नाहीत, तर काही ठिकाणी उंचीच वाढलेली नाही. कातळावरील रोपं पिवळी पडल्याने उत्पादन किती मिळेल याबाबत शेतकरी साशंक आहे.
जुन महिन्यात मॉन्सून उशिराने दाखल झाला. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर मंदावला. हेच चित्र सप्टेंबर महिन्यातही दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसात अधुनमधून एखाद-दुसरी सर पडत आहे. तर दिवसभर कडकडीत पडणार्या उन्हामुळे कातळावरील भातशेतीला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन ते 7 सप्टेंबर या कालवधीत सरासरी 2582 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कलावधीत 2971 मिमि पाऊस झाला होता. तुलनेत चारशे मिमि कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकुण क्षेत्रापैकी कातळावरील शेतीचे प्रमाण 20 टक्के म्हणजेच सुमारे 13 हजार हेक्टर इतके आहे. अनियमित पावसामुळे कातळावरील शेतीसह उशिराने लावणी झालेल्या क्षेत्रालाही फटका बसला आहे. रोपांची वाढ व्यवस्थित झालेली नाही. भात रोपे उन्हामुळे पिवळी पडली असून करपण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यात वरकस जमिन अधिक असल्याने भात उत्पादन घटीचा परिणाम जाणवण्याची भिती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.