
महामार्गावर तीन ठिकाणी तोडफोड प्रकरणी 16 जणांना अटक
रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी खळखट्ट्याक करण्यास सुरुवात केली असून खेडपासून राजापूरपयर्र्त तब्बल 16जणांना विविध गुन्ह्यात अटक केली असून 97जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई गोवा महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यातही रत्नागिरी जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये कामे रखडली असून काही भागात कामे वेगाने सुरु आहेत. दोन दिवसापूर्वी पनवेल येथे झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. रायगड येथे झालेल्या तोडफोडीनंतर दक्षिण रत्नागिरीतील पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. गुरुवारी रात्री राजापूर हातिवले येथे मनसेच्या पदाधिकार्यांनी टोलनाक्याची तोडफोड करीत घोषणाबाजी केली.
ठाकरे यांच्या भाषणानंतर अशा घटना घडतील या शक्यतेने पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती. मनसेच्या अनेक पदाधिकार्यांशी पोलीस संपर्कात होते. काहींना प्रतिबंधात्मक कारवाईसाठीही पावले उचलली होती.
हातिवले येथील घटनेनंतर रत्नागिरी तालुक्यातील खानू येथे ह्यान इन्फ्रा सोल्यूशन प्रा.लि. या कंपनीचे कंटेनर येथील कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी पाचजणांनी घोषणाबाजी करीत पळ काढला. याचा व्हिडीओही मनसे पदाधिकार्यांनी त्यानंतर व्हायरल केला होता. हा प्रकार घडलेला असतानाच शुक्रवारी दुपारी 11 वा. पालीजवळील उभी धोंड येथे एका जेसीबीची मनसेच्या पदाधिकार्यांनी तोडफोड केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, परिविक्षाधीन पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे मारुती जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर पोलिसांनी ह्यान कंपनीच्या आरएमसी प्लॅन्टवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. खानूमध्ये झालेल्या तोडफोडीमध्ये सुमारे 1 लाखाचे नुकसान झाले आहे. तर जेसीबीचेही नुकसान झाले आहे. पोलिसांनी यानंतर मनसे पदाधिकार्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.
राजापूर व रत्नागिरीतील तोडफोडीच्या तीन घटनांमध्ये तीन गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी 16जणांना अटक केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 97जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांना समज देण्यात आली आहे.