
सर्व विद्यार्थ्यांनी कायदेविषयक जुजबी ज्ञान आत्मसात करावे- निखिल गोसावी वरिष्ठ न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी.
मत्स्य महाविद्यालयात जागतिक युवा दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.
रत्नागिरी :12 ऑगस्ट हा दिवस सर्वत्र जागतिक युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने कायदेविषयक जनजागृती या कार्यक्रमाचे आयोजन
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी आणि डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य महाविद्यालय येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश श्री निखिल गोसावी, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रकाश शिनगारे, विद्यार्थी परिषदचे उपाध्यक्ष डॉ दबीर पठाण तसेच लोक अभिरक्षक कार्यालयाचे सहाय्यक विधी सेवा सल्लागार सौ आयुधा देसाई, श्री उन्मेश मुळे, सौ पल्लवी धोत्रे व श्री यतीन धुरत हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून श्री. उन्मेश मुळये यांनी अॅन्टी रॅगिंग या विषयावर मार्गदर्शन करताना रॅगिंग हा असा गुन्हा आहे की, जिथे एकीकडे पिडीत विद्यार्थींनी अनेकवेळा जीवघेणे पाउल उचलले आहे. तरी दुसरीकडे आराेपी आणि दोषी विद्यार्थींचे भवितव्यही डळमळीत होते. त्याचे दुष्परिणाम लक्षात घेवून सरकारने अनेक नियम व कायदे केलेले आहेत, याबद्दल उपस्थितांसमोर मत व्यक्त केले.
श्रीम. आयुधा अ. देसाई सहाय्यक विधी सेवा सल्लागार यांनी युवा दिनाबद्दल बोलताना युवा दिन का साजरा केला जाताे ? व तो आपण का साजरा करतो याबद्दल महत्वाची माहिती दिली. तसेच युवा दिन २०२३ च्या अनुषंगाने असणारा Green Skills for Youth :Towards a Sustainable World या विषयावर देखील मार्गदर्शन केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी चे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश श्री. निखिल गोसावी यांनी प्रस्तुत चा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतु आणि मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाद्वारे कायद्याची जनजागृती करून त्यांची माहिती देताना ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षी शांती स्थापनेत युवकांचा सहभाग’(युथ बिल्डींग पीस) हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. सृजनशील अशा युवा शक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी हा यामागचा विचार आहे असे त्यांनी त्यांच्या प्रस्ताविकामध्ये सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच कायदेविषयक जुजबी ज्ञान आत्मसात करावे तसेच जेवढे शक्य तेवढे सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे नमूद केले.
या कार्यक्रमात बोलताना मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रकाश शिनगारे यांनी मत्स्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी परिषद यांच्यामार्फत राबविलेल्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली तसेच भविष्यात सुद्धा विद्यार्थ्यांसाठी असे कार्यक्रम आयोजित केले जातील याची ग्वाही दिली. तांत्रिक सत्राच्या वेळी श्री उन्मेश मुळे यांनी अँटी रॅगिंग कायदा याविषयी सविस्तर माहिती उपस्थित सर्वांना दिली तर सौ आयुधा देसाई यांनी युवा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कायदासाथी श्री पांडुरंग नंदीवाले यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी चे सर्व कर्मचारी यांचा सहभाग लाभला.