
प्राथमिक शिक्षकाना बी.एल.ओ. कामातून वगळण्याची शिक्षक संघटनांची मागणी
रत्नागिरी : शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या शिक्षक संघटनांनी प्राथमिक शिक्षकाना’ बी.एल. ओ. कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. त्यासाठी विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांची येथे भेट घेतली.
यावेळी बी.एल.ओ. कामांतून शिक्षकांना का वगळले पाहिजे याची सविस्तर बाजू मांडली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या काही १ ते ४थी, १ ते ५वीं व १ ते ७ वी पर्यंत आहेत. सदर शाळांत वर्गनिहाय पाहता शिक्षक संख्या ही शाळानिहाय १ कींवा ३ अशी आहे. क्वचितच शाळामध्ये २ किंवा ४ शिक्षक असतात. प्राथमिक शिक्षकांना अध्यापन करताना जास्तीत जास्त दोन – चार असे वर्ग सांभाळावे लागतात, त्यामुळे अध्यापनात एक प्रकारची संबंधीत शिक्षकाची कसरत होते. तसेच प्रत्येक वर्गाची दिवसानिहाय अध्यापनाचे नियोजनाची जबाबदारी संबंधीत शिक्षकांकडे असते त्यातून शैक्षणिक गुणवत्ता वाढ करावी लागते. अध्यापना बरोबर सर्वकष सातत्यपूर्ण मूल्यमापनामध्ये तंत्रनिहाय मूल्यांकन करावे लागते. त्यामध्ये उपक्रम’, प्रकल्प, यांचा समावेश आहे. त्याला अनुसरून परीक्षा व विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा सराव घ्यावा लागतो. वरील मुद्द्यांचे महत्व व जबाबदारी मोठी आहे.
तसेच शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक, शिक्षक पालक सभा घ्याव्या लागतात व इतिवृत्त लिहावी लागतात. विध्यार्थ्यांसाठी सा. फु. द. पा. योजना, उपस्थिती भत्ता’ अशा विवीध योजनांचा लाभ देण्यासाठी कागदपत्र तयार करावी लागतात. शालेय पोर्टल वरील कामात प्रत्येक विध्यार्थ्याची आधार नोंदणी पासून पोर्टलवर विविध प्रकारची कामे करावी लागतात.
प्रशासनाकडून दर दिवशी प्राप्त परीपत्रकांची माहीती ही संबंधीत शाळेच्या शिक्षकाला देणे क्रमप्राप्त असते. अशा प्रकारे विविध प्रकारची अशैक्षणिक कामेही प्राथमिक शाळेतील शिक्षकच करत असतात. तसेच आजची परिस्थीती पाहता शिक्षक भरती होत नसल्याने शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी आहे. त्यामुळे बी.एल.ओ.च्या कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे.