
दरड प्रवण भागातील नागरिकांना समुपदेशनाने स्थलंतरीत करा : जिल्हाधिकारी
निवाऱ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी यादी बनवा
रत्नागिरी, : दरड प्रवण भागातील नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांना स्थलांतरणास प्रवृत्त करावे. तसेच त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ज्यांची वैयक्तिक जागा आहे, अशांची यादी बनवा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्र.अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, तहसीलदार ज्योती वाघ आदी उपस्थित होते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी सुरुवातीला संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी तहसीलनिहाय आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्हयातील किती साकव धोकादायक आहेत ? त्याबाबत सविस्तर माहिती द्यावी. झालेल्या नुकसानीबाबतच्या पंचनाम्याची आणि मदतीची सविस्तर माहिती पाठवावी. जिल्हयात ऑरेंज अलर्ट असल्याने उद्या-परवा सुट्टी असली तरी सर्व यंत्रणेने अधिक खबरदारी घेत सतर्क राहणे आवश्यक आहे.
दरवर्षी पावसाळयात स्थलांतरण करायला लागू नये, यासाठी ज्यांच्याकडे वैयक्तिक जागा आहे, पण धोकादायक दरड प्रवण भागात सध्या त्यांची घरे आहेत, अशांची एक यादी बनवा. विशेष प्रयत्नातून तसेच आवास योजनेच्या माध्यमातून त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवू.सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असेही ते शेवटी म्हणाले.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, उद्या-परवा सुट्टी असल्याने पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडण्याची शक्यता आहे. पर्यटन स्थळ पोलीस बंदोबस्त चोखपणे ठेवला जाईल त्यासाठी सर्वच यंत्रणेने खबरदारी घ्यावी.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनीही कायमस्वरुपी निवारा करण्याबाबत विविध योजनांचा लाभ देता येईल त्याबाबत अहवाल करण्याविषयी सूचना केली.
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
