
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा ‘पतसंस्था आपल्या दारी प्रवास दौरा’ उत्साहात संपन्न
रत्नागिरी: संपूर्ण जिल्ह्याची आर्थिक जीवनदानी समजल्या जाणाऱ्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक वाटचाल अल्पावधीतच नावारूपाला आली.सक्षम व कार्यतत्पर संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी व समन्वयी समिती पदाधिकारी यांचे सहकार्य तसेच समाज बंधू-भगिनी व सभासद यांच्या मोलाच्या योगदानाने ही यशस्वी घोडदौड सुरू असल्याचे सांगताना आनंद होत आहे.
पतसंस्थेची सद्यस्थिती भविष्यातील ध्येयधोरणे त्याचप्रमाणे सामाजिक व आर्थिक विकासात्मक हितगुज करण्यासाठी दिनांक 16, 17 व 18 जुलै 2023 रोजी गुहागर तालुक्यातील सागरी किनारपट्टीवरील 14 गावांमध्ये पतसंस्था आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत सभा झाल्या.गावातील सभांना अतिशय उत्तम पद्धतीने प्रतिसाद लाभला. समाज उन्नती साधायची असेल तर समाज जनजागृती महत्त्वाची आहे. यासाठी स्थानिक मानकरी पाटील गावकरी प्रतिष्ठित नागरिक यांनी सजग होऊन समाज जागृतीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची जाणीव झाली.
•समाजातील प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावत नाही तोपर्यंत कोणताही समाज सक्षम समाज म्हणून नावा रूपाला येत नाही.म्हणून संपूर्ण समाजातील प्रत्येक घटक आर्थिक सक्षम व्हावा यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील सुशिक्षित तरुण मुला-मुलींना व्यवसायासाठी कर्ज, समाजातील महिलांना त्यांच्या इच्छेनुसार व्यवसाय अथवा सर्व प्रकारची कर्ज, महिलांना बचत गटांना आर्थिक सहाय्यक करून सामाजिक आर्थिक सक्षमता आणण्यासाठी पतसंस्था सहकार्य करेल असे अभिवचन पतसंस्थेच्या जिल्हा दौऱ्याच्या सभांमधून देण्यात आले.
•समाजातील प्रत्येक घटकांनी सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार पतसंस्थेच्या माध्यमातून केल्यास समाजातील घटकांबरोबरच पतसंस्थेचा ही आर्थिक स्तर उंचावणार आहे, पर्यायाने समाजाचा विकास होणार आहे. तरी सर्वांनी पतसंस्थेचे सभासद होऊन पतसंस्थेच्या आर्थिक उलाढालीमध्ये व संस्था अधिक मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. पतसंस्था आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत सर्वच गावातून पतसंस्थेच्या उपक्रमाचे स्वागत झाले व पतसंस्था समाजाची अभिमानाची बाब म्हणून गौरविण्यात आले. या दौऱ्यानिमित्त पतसंस्था संचालक कर्मचारी व समन्वय समिती पदाधिकारी ज्या ज्या गावी गेले त्या-त्या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. पतसंस्थेच्या वतीने आम्ही सर्वांचे आभारी आहोत असेच सहकार्य पतसंस्थेला आपल्या सर्वांकडून सातत्याने मिळत राहो. अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व समाजातल्या बंधू-भगिनींना धन्यवाद देत या प्रवास दौऱ्याची सांगता झाली.