
दरडोई उत्पन्नात रत्नागिरी राज्यात 8 वा
रत्नागिरी :मागील वर्षाच्या तुलनेत 29 हजार 888 ची वाढ करत रत्नागिरी जिल्हा दरडोई उत्पन्नात राज्यात 8 व्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निवास यादव यांनी दिली.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी याबाबत राज्याची जिल्हावार उत्पन्न अंदाजाची माहिती mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. दरडोई निव्वळ उत्पन्न काढण्यासाठी 2011-12 हे वर्ष पायाभूत धरण्यात आले आहे. त्यावर्षी जिल्ह्याचे दरडोई निव्वळ उत्पन्न हे 84 हजार 833 रुपये इतके होते. मागील वर्षी म्हणजेच 2020-21 ला 1 लाख 71 हजार 196 रुपये इतके होते. ते 29 हजार 888 रुपयाने वाढून सन 2021-22 ला 2 लाख 1 हजार 84 रुपये इतके झाले आहे.
कृषी 5 हजार 767 कोटी, पशुसंवर्धन 1 हजार 35 कोटी, वने व लाकूड तोडणी 1 हजार 572 कोटी, मत्स्यव्यवसाय 931 कोटी, खाण व दगड खाणकाम 140 कोटी, वस्तू निर्माण 4 हजार 13, वीज, वायू, पाणीपुरवठा व इतर उपयोगिता सेवा 535 कोटी, बांधकाम 1 हजार 760 कोटी, व्यापार, हॉटेल्स व उपहारगृहे 2 हजार 518 कोटी, रेल्वे 128 कोटी, परिवहन 533 कोटी, साठवण 53 कोटी, दळणवळण व प्रसारणसंबधी सेवा 307 कोटी, वित्तीय सेवा 2 हजार 981 कोटी, स्थावर मालमत्ता व राहत्या घरांची मालकी व व्यवसायिक सेवा 5 हजार 216 कोटी, सार्वजनिक प्रशासन 965 कोटी, इतर सेवा 2 हजार 52 कोटी अशी क्षेत्रनिहाय निव्वळ मूल्यवृद्धी असून निव्वळ जिल्हा उत्पन्न 34 हजार 895 कोटी इतके आहे.