
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी आनंद शेलार यांची निवड
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी विद्यामंदिर पावसचे ज्येष्ठ शिक्षक आनंद शेलार यांची निवड झाल्याचे केंद्रीय समितीकडून जाहीर करण्यात आले.
कोकण विभागातील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्याकडून विविध अंगी साहित्य लेखन व्हावे या हेतूने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे स्थापना केली. अशा या संस्थेवर आनंद शेलार यांची नुकतीच निवड करण्यात आली असून केंद्रीय अध्यक्ष माननीय सौ. नमिता कीर व केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे. आनंद शेलार हे स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस या शाळेत मागील 37 वर्ष अध्यापनाचे काम करत आहेत. प्रशालेतील विविध शैक्षणिक उपक्रमांबरोबरच त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार दिलेले आहेत. तसेच सध्या ते विविध संघटनांमध्ये कार्यरत असून पावस ग्रामपंचायतीमध्ये तंटामुक्ती सदस्य म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत.