
धरणात पोहताना सर्पदंश होऊन एकाचा मृत्यू
चिपळूण :- कळवंडे धरणावर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुंबई – घाटकोपर येथील एका व्यक्तीला पाण्यातच तीनवेळा सर्पदंश होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय तुकाराम कापरट ( ४६ , रा. घाटकोपर , मुंबई )असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे . ही घटना ९ जुलै रोजी घडली . मुंबई घाटकोपर येथून पाच मित्र दोन दिवसांपूर्वी पावसाळी सहलीसाठी संगमेश्वर परिसरातील आपल्या गावी आले . तेथे फिरुन रविवारी ते चिपळूण तालुक्यातील कळंवडे येथील धरणावर पोहण्यासाठी आले . दुपारी ३ वाजता ते कळवंडे धरणावर पोहण्यासाठी उतरले . याच वेळी संजय याला पाण्यातच तीनवेळा सर्पदंश झाला . सुरुवातीला ते त्याला समजले नाही . त्यानंतर त्याच्या अंगात विष चढू लागल्याने तो अस्वस्थ झाला . त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले . तेथे उपचारासाठी वेळ लागणार असल्याने त्याला कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले . प्रकृती खालावल्याने त्याला डेरवण येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला . तीनवेळा सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .