
आषाढी एकादशी व बकरी ईद” निमित्त, “रत्नागिरी जिल्हा शांतता समिती” बैठक संपन्न
रत्नागिरी : आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. 26/०६/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात जिल्हाधिकारी रत्नागिरी, श्री. एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार व मान्यवर सदस्य, समाजातील मान्यवर व्यक्ति/सदस्य तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितित “रत्नागिरी जिल्हा शांतता समिती” ची बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व धर्मांचे सण-उत्सव सलोख्याच्या वातावरणात साजरे करण्याबाबत चर्चा करण्यात आली, प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिनांक 29/06/2023 रोजी “आषाढी एकादशी” व “बकरी ईद” हे दोन महत्त्वाचे सण साजरे होणार असल्याने, दोन्ही सण शांततेत साजरे होण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी रत्नागिरी, श्री. एम. देवेंदर सिंह तसेच पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी यांनी सर्व उपस्थित सदस्यांना याबाबत आवाहन करण्यात आले.पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांनी सर्व मान्यवर व सदस्यांच्या उपस्थितित, रत्नागिरी मधील सर्व नागरिकांना विनंती करून, सोशल मिडियाद्वारे आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्ह संदेश व व्हिडीओ प्रसारित केल्यास रत्नागिरी पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्याचा इशारा दिला व याबाबत आग्रही भूमिका मांडली.

“रत्नागिरी जिल्हा शांतता समिती” च्या आभार प्रदर्शनादरम्याने पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी यांनी शासनाच्या “अमली पदार्थ मुक्त भारत अभियान (Drug Free India Campaign)” या मोहिमे अंतर्गत, रत्नागिरी पोलीस दलाच्या सोशल मिडिया च्या माध्यमाद्वारे तसेच पोलीस ठाणे स्तरावर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीसांद्वारे, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी योग्य संवाद साधून अमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामाविषयी देखील जनजागृती करण्यात येत असल्याबाबत ही सांगितले.