
बर्फवृष्टी, कडाक्याच्या थंडीतून ‘स्वर्गारोहिणी’ ट्रेक
रत्नागिरी, ः कधी बर्फवृष्टी, कडाक्याची थंडी, अधूनमधून कड्याकपाड्यांमधून येणारे छोटे छोटे दगड यांचा सामना करत हिमालयातील खडतर अशा समुद्रसपाटीपासून १४ हजार फुटाहून अधिक उंचीवर असलेला स्वर्गारोहिणी ट्रेक रत्नागिरीतील चौदाजणांनी पूर्ण केला. पांडव स्वर्गाकडे गेले तो हिमालयातील मार्ग म्हणजेच स्वर्गारोहिणी होय.
हिमालयातील म्हणजे देवभूमीतील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे चार धाम प्रत्येक भारतीयाला माहिती आहेत. बद्रीनाथ मंदिराच्यामागे ३९ किमी अंतरावर नर आणि नारायण पर्वतरांगांच्या विळख्यात स्वर्गारोहिणी हे ठिकाण आहे. अवतार समाप्तीवेळी पांडव याच मार्गाने स्वर्गाकडे गेले. रत्नागिरीतील संजय लोखंड, शिवानंद जठार, मनीष देसाई, विजय इंगळे, हरिश साळवी, संतोष गुरव, वरद जठार, दिलीप पाडावे, दिलीप सावंत, वैष्णवी सावंत, करिष्मा गोताड, उमेश कुलकर्णी, मधुरा दिलीप पाडावे हे सहभागी होते.
या ट्रेकबाबत संजय लोखंड यांनी माहिती दिली. मनीष शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली आठ पिंटू टीममध्ये होते. माणा गावातून ट्रेकला सुरवात झाली. पर्वतावर श्रीगणेश व व्यासऋषी यांच्या गुहा आहेत. दोन गुहेतील अंतर अर्धा किमी आहे. याच ठिकाणाहून पांडव स्वर्गाकडे रवाना झाले. येथील दोन डोंगरांमध्ये पांडवाना प्रवास सुलभ करता यावा म्हणून भिमाने एक दगड ठेवला आहे. त्याला भिमशिला म्हणतात. पहिल्या मुक्कामावेळी रात्री प्रचंड हिमवर्षाव झाला. बर्फ साचलेल्या ठिकाणाहून चालत दुसऱ्या दिवशी दोन मोठे बर्फाळ पर्वत चढलो. तेथे अलकनंदा नदीचा उगम पाहता आला. समुद्रसपाटीपासून १४ हजार फुटापेक्षा जास्त उंचीच्या चौखोबा पर्वतावर पोचलो. तेथून दीड किलोमीटर बर्फावरून घसरत खाली आलो. या प्रवासात कडाक्याची थंडी होतीच. सतोपंत तलावाजवळ भिमाने प्राण सोडल्याचा दाखला महाभारतात दिला जातो. हा परिसर पाहिल्यानंतर आम्ही पुढे गेलो. या परिसरात अनेक गुहा पाहायला मिळाल्या. त्यात अनेक साधू महिनोनमहिने तपस्या करत असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी आल्यानंतर बर्फवृष्टीला सुरवात झाली. पुढे काहीच दिसत नव्हते. अखेर आम्हाला तिथून माघारी परतावे लागले. या ठिकाणाहून ३ किमी अंतरावर स्वर्गारोहिणी पायऱ्या आणि कर्णकुंड, सूर्यकुंड ही ठिकाणे होती. तेथील देवभूमीला नमस्कार करून आम्ही माघारी आलो. पुढे बद्रीनाथ, केदारनाथ असा प्रवास केला.