
पंढरीनाथ आंबेरकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता
रत्नागिरी :राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीशे खून प्रकरणातील संशयित पंढरीनाथ आंबेरकरने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सोमवारी सुनावणी झाली असून आज निकाल लागण्याची शक्यता आहे.
सरकारी पक्षातर्फे न्यायालयासमोर युक्तिवाद करण्यात आला. मात्र, या बाबत न्यायालयाने अद्यापही निर्णय दिला नसून मंगळवारी या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शशिकांत वारिशे खून प्रकरणाची घटना ६ फेब्रुवारीला दुपारी १ वा. च्या सुमारास राजापूर पेट्रोल पंप येथे घडली होती. वारिशे पेट्रोल भरुन बाहेर पडले होते. त्यावेळी संशयित आंबेरकरने आपल्या ताब्यातील महिंद्रा थार गाडीने वारिशेंच्या दुचाकीला समोरुन धडक देत चिरडले होते. असा आरोप संशयितावर ठेवण्यात आला होता. या अपघातात शशिकांत वारिशे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पत्रकार वारिशे याचा मेहुणा अरविंद दामोदर नागले यांनी राजापूर पोलिस ठाण्यात संशयित आंबेरकर याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावरुन पोलिसांनी भादंवी कलम ३०२, २०१ व महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम २०१७ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
आंबेरकरच्या जामीन अर्जावर न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड. फणसेकर यांनी युक्तवाद केला मात्र यावर न्यायालयाने अद्यापही निर्णय दिला नसून मंगळवारी यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.