
जिल्ह्यात प्राणी गणनेत आढळले ९९ प्राणी
चिपळूण:- बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन विभागाकडून जिल्ह्यात पंधरा ठिकाणी प्राणी गणना करण्यात आली. या गणनेत ९९ प्राणी मुक्त संचार करताना आढळले. त्यात माकड, गवा आणि रानडुकरांची संख्या जास्त आहे. प्राणी गणनेत एकमेव कोळकेवाडी धरणावर बिबट्या आढळला.
बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री म्हणजे ५ आणि ६ मे महिन्यात प्राणी गणना करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला होता. उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. अशा वेळी जिथे पाणी, तिथे प्राणी आवर्जून जातात. बुद्धपौर्णिमा ही सर्वाधिक प्रकाश असलेली रात्र असते. त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी पाणवठ्यावर येतील, या हिशोबाने वन कर्मचारी सायंकाळपासून पाणवठ्यावर मुक्काम ठोकून होते. पंधरा ठिकाणी १६ प्रकारचे प्राणी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर आल्याचे आढळले.