
वंदे भारत एक्स्प्रेसचा 26 जूनला पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
रत्नागिरी :ओडिशामधील बालासोर रेल्वे अपघातामुळे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवा लांबणीवर पडली होती. मात्र आता वंदे भारत एक्स्प्रेसच्या शुभारंभासाठी 26 जून हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच दिवशी भोपाळ येथून पाच एक्स्प्रेसला हिरवा झ्ोंडा दाखविणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांची प्रवाशांची प्रतिक्षा आता संपणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला असून मडगावमुंबई सीएसएमटी वंदे भारत दि. 26 जून पासून सुरु होईल. या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी व खेड येथे थांबा देण्यात आला आहे. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी 5.35 वाजता सुटेल. ठाणे 6.05, पनवेल 6.40, खेड 8.40, रत्नागिरी 10.00, मडगाव दुपारी 1.25 अशा तिच्या वेळा असतील. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 2.35 वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ 5.35 आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल.
भारतीय रेल्वे विभागाकडून पाच मार्गांवर वंदे भारत सेवा सुरु करण्यात येणार आहे. 5 वंदे भारत एक्स्प्रेस एकाच दिवशी सुरु करण्यात येणार आहे. दि.26 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये उपस्थित राहणार आहेत. भोपाळमधून दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहेत. इतर तीन ठिकाणांहून सुरु होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचं नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. मुंबई-मडगाव, बंगळुरु-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदोर, भोपाळ-जबलपूर या पाच वंदे भारत एक्स्प्रेसच उद्घाटन होणार आहे. या पाचही वंदे भारत एक्स्प्रेसला 8 कोच असणार आहेत. यातून एकावेळी 530 प्रवासी प्रवास करु शकतात.