
पॅसेंजरचा दादरपर्यंत विस्तार करण्याची प्रवाशांकडून मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरी दादर पॅसेंजर आता दिव्यावरून सुटत असल्याने पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिवा रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे गाडीचा विस्तार दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत करण्याची मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.
झिरो बेस्ड टाइम टेबल अंतर्गत यापूर्वीची ५०१०३/५०१०४ रत्नागिरी दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे गाडीला रत्नागिरी दिवा रत्नागिरी पॅसेंजरमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने रत्नागिरी दादर पॅसेंजर गाडी दिव्याला नेऊन त्याच वेळेत दादरहून ०१०२५/०१०२६ दादर बालिया एक्सप्रेस (सोमवार, बुधवार, शुक्रवार) आणि ०१०२७/०१०२८ दादर गोरखपूर एक्सप्रेस (रविवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार).
तसेच, गुजरातमधील वापी, सुरत, वरोडदरा, अहमदाबाद या शहरांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या कोकणवासीयांना पूर्वीच्या रत्नागिरी दादर पॅसेंजरचा फायदा होत होता. परंतु, आता ही गाडी दिव्या वरून सुटत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर मध्य रेल्वेने रत्नागिरी दादर पॅसेंजरचे दिवा रोहा मार्गावरील जवळपास ९ थांबे रद्द केले आहेत. मात्र, प्रवास वेळेत बचत होत नाही.
पनवेल येथे पाणी भरण्यासाठी दिवा रत्नागिरी पॅसेंजरला ३० ते ४५ मिनिटे थांबावे लागते. तसेच, गाडीच्या सुरुवातीच्या स्थानकातच पाणी भरले गेले पाहिजे, अशा रेल्वे बोर्डाच्या सूचना असूनही त्यांचे पालन केले जात नाही. ९ थांबे करूनही मध्य रेल्वेवर या गाडीच्या प्रवास वेळेत काहीही घट झालेली नाही. एकूण प्रवास वेळेत केवळ १० ते २० मिनिटे कपात झाली आहे.
प्रत्यक्षात एका थांब्यासाठी ८-१० मिनिटे गृहित धरल्यास किमान १ तासाची घट अपेक्षित होती. त्यामुळे मध्य रेल्वेने डाऊन दिशेने जाणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे गाडीमध्ये दिव्यासाठी काही अनारक्षित डबे निश्चित आणि लॉक करून ही गाडी दादर किंवा सीएसएमटीपर्यंत वाढविण्याची मागणी रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी दिली आहे.
मध्य रेल्वेवर कमी केलेले थांबे (९): दातिवली, निळजे, तळोजे, नावडे रोड, कळंबोली, सोमाटणे, रसायनी, हमरापूर, निडी कोकण रेल्वेवर नव्याने दिलेले थांबे (२): कळंबणी बुद्रुक, कडवई