
गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी वसाहतीची पायाभरणी
रत्नागिरी :पोलीस कर्मचारी वसाहत, जिल्हा पोलीस मुख्यालय व अन्य इमारतींच्या पायाभरणी समारंभासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जूनच्या 10 किंवा 11 तारखेला रत्नागिरीत येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निमित्ताने वेगळा उपक्रम म्हणून राज्यातील सर्व पोलीस बॅण्डची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयातील वसाहती या इंग्रजांच्या कालावधीतील असून, मागील सत्तर-ऐंशी वर्ष त्यांची फक्त डागडूजी केली जात होती. मात्र याठिकाणी आता अद्ययावत 14 मजली इमारती उ÷भ्या राहणार आहेत. त्याचप्रमाणे पोलीस मुख्यालय, हॉल व अन्य इमारतींची बांधकामेही या ठिकाणी केली जाणार आहेत. यासाठी तब्बल 129 कोटींचा निधी मंजूर झाला असून, या गृह व कार्यालयीन प्रकल्पांची निविदा प्रक्रियाही करण्यात आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ केला जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
या निमित्ताने राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस बॅण्ड पथकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातील विजेत्याला पाच लाख, उपविजेत्याला 3 लाख तर तृतीय क्रमांकाला 2 लाखाचे पारितोषिक दिले जाणार आहे. हे पारितोषिक पोलीस कल्याण निधीमध्ये जमा केले जाणार आहे. पारितोषिकातील 25 टक्के रक्कम ही पोलीस बॅण्डच्या अपग्रेडेशनसाठी खर्च करता येणार आहे. या स्पर्धेनिमित्त राष्ट्रगीत, राज्यगीत व सारे जहाँ से अच्छा ही गाणी सादर करावी लागणार आहेत. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रसिध्द गायक सुदेश भोसले, संगीतकार मयुरेश पै, संगीत संयोजक नितीन शंकर हे काम पाहणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.