
जाकादेवी सेंट्रल बँक दरोड्यातील तिघांना जन्मठेप
रत्नागिरी:जाकादेवी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर भरदुपारी दरोडा टाकून कर्मचारी संतोष शांताराम चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या करत बँकेतील 6 लाख 88 हजारांची रोकड लंपास केल्याचा आरोप असलेल्या सहाजणांपैकी तिघांना न्यायालयाने जन्मठेपेठेची शिक्षा ठोठावली तर अन्य तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ही घटना दि.28 नोव्हेंबर 2013 रोजी दुपारी 1.30 वाजता घडली होती.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जाकादेवी शाखेत दि.28 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 10.30 वाजता बँकेचे कामकाज नियमितपणे सुरू होते. शेतकरी, ठेवीदार, कर्जदार यांच्यासह विद्यार्थी खातेदार यांच्यासमवेत कर्मचारी नियमित व्यवहार करत होते. दुपारी बँकेला जेवणाची सुट्टी होण्यापूर्वी 1.30 वाजण्याच्या सुमारास बुरखाधारी पाचजण अचानक बँकेत शिरले. त्यातील दोघांकडे रिव्हॉल्व्हर होते. बँक कॅशियर, कर्मचारी, ठेवीदार यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखून पाचजणांनी ठार मारण्याची धमकी देत पैशाची मागणी केली. यावेळी एकानेही विरोध केलेला नसताना कर्मचारी सुरेश गुरव, संतोष शांताराम चव्हाण या दोघांवर एकाने गोळी झाडली. यामध्ये संतोष चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर सुरेश गुरव गंभीर जखमी झाले होते. बँकेत गोळीबार झाल्यामुळे सर्व कर्मचारी, ठेवीदार घाबरलेल्या स्थितीत असताना कॅशियरला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पाचजणांनी 6 लाख 88 हजार रु.ची रोकड घेऊन कारमधून पोबारा केला होता.
अचानक पडलेल्या दरोड्यामुळे कर्मचाऱ्यांसह ठेवीदार गोंधळून गेले होते. अशातच संतोष चव्हाण यांची हत्या झाल्यामुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली होती. शाखा व्यवस्थापक अलका कवीश्वर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात पाचजणांविरोधात भा.दं.वि. क.397, 398, हत्यारबंदी कायदा, 120 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दरोडा प्रकरणात तपास तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी तुषार पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास केल्यानंतर श्री.पाटील यांनी राजेंद्रसिंग नवलस किशोरसिंग राजावत (वय 35, रा.कल्याण पूर्व, मूळ मध्यप्रदेश), प्रशांत प्रभाकर शेलार (23, रा.डोंबिवली पूर्व), निखिल मारूती सावंत (वय 24, रा.डोंबिवली, मूळ राई-भातगाव), प्रथमेश संतोष सावंत (रा.भातगाव), हरेशगिरी गोस्वामी (रा.कल्याण पूर्व), शिवाजी उर्फ सागर बाळू विसे (रा.कल्याण पूर्व) या सहाजणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
खटल्याचा तपास सुरू असतानाच सरकारी पक्षाच्या वतीने 34 साक्षीदार तपासण्यात आले. तर संपूर्ण खटल्यादरम्यान सरकारी वकील ॲड.पुष्कराज शेट्ये यांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिलेल्या 66 निर्णयांचा दाखला या खटल्यादरम्यान न्यायालयात दिला होता. तर आरोपींच्या वतीने यातील काही साक्षीदारांना फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु सरकारी पक्षाने तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.
गुन्ह्यातील सहा जणांवर कट रचून दरोडा टाकून कर्मचारी संतोष चव्हाण यांची हत्या, कर्मचारी सुरेश गुरव यांना मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल होते. दरोडा टाकण्यासाठी पाचजण आले होते तर दरोडा टाकण्याच्या आदल्या दिवशी भातगाव येथील प्रथमेश सावंत याने मुख्य आरोपी राजेंद्रसिंग राजावत याला बँक परिसर दाखवून रेकी केली होती. त्यामुळे या प्रकरणात प्रथमेश सावंत यालाही पोलिसांनी नंतर अटक केली होती.
खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने राजेंद्रसिंग नवस किशोरसिंग राजावत, प्रशांत प्रभाकर शेलार, निखिल मारूती सावंत या तिघांना याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेसह राजेंद्रसिंग राजावत याला 65 हजार रुपयांचा दंड तर उर्वरित दोघांना प्रत्येकी 60 हजार रु.चा दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. तर प्रथमेश सावंत, हरेशगिरी गोस्वामी, शिवाजी उर्फ सागर बाळू विसे या तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.पुष्कराज शेट्ये यांनी काम पाहिले. तर या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी तुषार पाटील, अशोक बनकर यांनी केला होता. तर खटला सुनावणीदरम्यान तत्कालीन पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांनी सरकारी पक्षाला उत्तम सहकार्य दिले होते. तर पैरवी अधिकारी म्हणून अनंत जाधव, सुनिल आयरे यांनी काम पाहिले होते.
या महत्त्वपूर्ण खटल्यात तिघांना शिक्षा सुनावताना न्यायालयाने तिघांची निर्दोष सुटका केली. या तिघांच्या वतीने ॲड.संकेत घाग यांनी बाजू मांडली होती. त्यांनी मांडलेली बाजू न्यायालयाने ग्राह्य धरत तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.