
वृद्ध कलाकारांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न अखेर निकाली
रत्नागिरी :सध्या परंपरेने आलेल्या काही लोककला लोप पावण्याच्या स्थितीत आहेत. त्या जगविण्याचे काम अनेक कलावंत करत आहेत. या लोककलेतून जनजागृतीचे सुद्धा कार्य केले जाते. याची दखल शासनाने घेत वृद्धकलाकारांना मानधन देण्याचे काम शासन करत असून गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या मानधन प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यातील एकूण 181 कलावंतांचे प्रस्ताव मंजूर झाले तर 123 अपात्र आणि 172 अपूर्ण प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.
लोककलेतून जनजागृती आणि प्रबोधन करताना मनोरंजन असताना हा कलावंत उपेक्षित राहतो. त्यासाठी राज्य शासनाच्यावतीने वृध्द कलावंत व साहित्यिकांना मानधनाची योजना सुरू आहे. पालकमंत्री यांनी निर्देशित केलेल्या एका मान्यवर ज्येष्ठ कलावंतांची निवड समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काम पाहिले.
या समितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी किंवा तहसिलदार आणि इतर विविध कला क्षेत्रातील चार ते पाच मान्यवराचा समावेश असतो. समितीला वयोवृद्ध कलावंत/साहित्यिक यांनी मानधनासाठी केलेल्या अर्जाची छाननी करून राज्य शासनाला लाभार्थ्यांचे अर्ज शिफारशीसह पाठविण्यात अधिकार असतात.
पूर्वी वर्षात केवळ 60 अर्ज मंजूर करण्याचे अधिकार जिह्यास्तरीय समितीला होते. आता 100 अर्ज मंजूर करण्याचे अधिकार प्रत्येक जिल्हा निवड समितीला दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातही या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. प्रत्येक वर्षी 100 कलाकारांना मानधन योजनेचा लाभ देण्याचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने सन 2020-21, सन 2021-22 आणि सन 2022-23 या वर्षांमधील प्राप्त प्रस्तावांमधुन पात्र प्रस्तावांची निवड करून कलावंत/ साहित्यिक / निवड समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी 48 हजार पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व टाळकरी, विणाधारा व सहगायक / सहकलावंत असलेल्या कलावंताचे प्रस्ताव अपात्र ठरवून नामंजूर करण्यात आले आहे.