
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ॲड.दीपक पटवर्धन यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड
रत्नागिरी :स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती. आज दिनांक ९ मे रोजी नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सुधीर कांबळे यांचे अध्यक्षतेखाली झाली. त्या सभेमध्ये ॲड.दीपक पटवर्धन यांची अध्यक्षपदी तर माधव गोगटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
श्री.जयप्रकाश पाखरे, श्री.प्रसाद जोशी, श्री.अजित रानडे, श्री.राजेंद्र सावंत, सौ.बापट, सौ.गोगटे, श्री. संतोष प्रभू, श्री.शरदचंद्र लेले सर, श्री. प्रदीप कुलकर्णी आदी नवनिर्वाचित संचालक मंडळाने एकमुखाने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड केली. बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी श्री.सुधीर कांबळे यांनी घोषित केले.
सलग ३ ऱ्या टर्म मध्ये ॲड.दीपक पटवर्धन हे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले ॲड. दीपक पटवर्धन यांनी स्वरूपानंद पतसंस्थेचे माध्यमातून सहकार क्षेत्राचा श्रीगणेशा केला.
स्वरूपानंद पतसंस्थेच्या सर्व ४३ हजार सभासदांनी आपल्याला परत एक संधी दिल्याबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले असून माझ्यावर दर्शवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण अधिक द्रुतगतीने वाढवण्यासाठी संचालकांच्या साथीने काम करणार असल्याचे ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. शाखा विस्तार, ३०० कोटींच्या ठेवी, २०० कोटींचे कर्ज हे टारगेट ठेवत स्वरूपानंद पतसंस्था काम करणार आहे. सहकार क्षेत्रात मिळालेल्या हया सातत्यपूर्ण संधीचा उपयोग करत विश्वासार्ह, रचनात्मक, अर्थविश्व उभारता आलं याच समाधान लाखमोलाच आहे. अनेकविध नवे आर्थिक उपक्रम घेऊन नवनवीन योजना घेऊन स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ग्राहकांसमोर येईल. एखाद्या आर्थिक संस्थेचे अध्यक्षस्थान सलग २० वर्ष भूषवायला मिळणे ही गोष्ट खूप बोलकी आणि माझ्यासाठी अमूल्य अशी आहे. संस्थेच्या प्रत्येक स्पंदना बरोबर काम करत असताना जो अनुभव मिळाला त्या अनुभवातून स्वामी स्वरूपानंद पतसंस्था अधिक विस्तारात गेली. केवळ ३०० सभासद आणि १० हजारांचे भांडवल ह्या अत्यल्प पण मूल्यवान आधारावर आज ४०० कोटींचं खेळत भांडवल, २६३ कोटींच्या ठेवी, १८५ कोटींची कर्ज, ३६ कोटी ८४ लाखाचा स्वनिधी, १७ शाखा, ७ स्वमालकीची प्रशस्त कार्यालय तालुका क्षेत्रापासून सुरुवात करत राज्यक्षेत्रापर्यंतची मजल, विक्रमी वसुली, १५०० रुपयाचा निव्वळ नफ्यापासून सुरुवात करत ०६ कोटी ६१ लाखांचा सातत्यपूर्ण निव्वळ नफा अशी भक्कम आर्थिक स्थिती घडवण्याची ही संधी माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. सहकारामध्ये झालेले हे रचनात्मक काम आणि त्यातूनच प्राप्त होणारी सातत्यपूर्ण संधी आहे. विश्वासार्हता हा या सर्वांचा गाभा आहे. या नव्या टर्ममध्ये सर्व सहकारी, संचालक, कर्मचारी यांचे सहकार्याने पतसंस्थेचे व्यापक स्वरूप अधिक विस्तारण्यासाठी प्रयत्न करू असे सांगत अॅड. दीपक पटवर्धन यांनी सर्वांना धन्यवाद दिले.