
काजरघाटीतील पऱ्यातील गाळ उपसा कामाला प्रारंभ
रत्नागिरी ः पोमेंडी खुर्द-काजरघाटी येथील पऱ्या गाळाने भरल्याने पावसाळ्यात पुराच्या कालावधीत घरात आणि शेतजमिनीत पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे या पऱ्यातील गाळ उपशाची मागणी होती. त्याप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांनी गाळ उपशासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने गाळ उपशाच्या कामाला सुरवात झाली आहे.
महाराष्ट्र शासन व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे काम सुरू झाले आहे. याचा शुभारंभ सरपंच भाभी पिलणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या वेळी उपसरपंच प्रकाश जाधव, ग्रामसेवक श्री. ठीक, ग्रामस्थ दिलीप पटवर्धन, सुयश पिलणकर, राजा पटवर्धन, तुषार पवार, श्री. नार्वेकर, बाळा पिलणकर, चित्तरंजन पिलणकर, प्रसाद शिंदे, सौ. पवार आदी उपस्थित होते. गाळ उपशामुळे येथील पात्र खोल होऊन पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विहिरींची पाणी पातळीही वाढण्यास मदत होणार असल्याने येथील ग्रामस्थांनी या कामाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, या कामामध्ये लोक सहभाग महत्वाचा असून मशीन ऑपरेटर यांची राहण्याची सोय ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या भोजनाचा खर्च ग्रामस्थांनी, शेतकरी यांनी सामूहिकरित्या करायचा आहे. त्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग आर्थिक स्वरूपात किंवा जिन्नस स्वरूपात आवश्यक आहे. त्यासाठी उपसरपंच प्रकाश जाधव यांच्याकडे संपर्क साधावा आणि वस्तुरूप किंवा आर्थिक मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.