
शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या
कोकणातील डीएड, बीएड् पदवीधारकांची मागणी
रत्नागिरी:- कोकणात परजिल्ह्यातून शिक्षक येतात आणि काही वर्षांनी बदली करून निघून जातात. जिल्हा परिषद शाळा वाचवायच्या असतील तर स्थानिक शिक्षकांना भरतीत प्राधान्य द्या, त्यासाठी स्वतंत्र निकष वापरून शिक्षक भरती करा, अशी मागणी कोकणातील डीएड्, बीएड् धारक करत आहेत. पेसाप्रमाणेच स्वतंत्र निकष वापरून कोकणासाठी स्वतंत्र शिक्षक भरती करा, अशी मागणी डीएड्, बीएड् धारकांबरोबरच गावागावामधून होऊ लागली आहे.
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक हे मोठ्या प्रमाणात बदली करत आहेत. काही दिवसांपूर्वी ७२५ शिक्षक जिल्हा बदली करून आपापल्या गावी निघून गेले. २०१० ला व त्यानंतर २०१७ मध्ये शिक्षक भरती झाली. त्या तुलनेत जिल्हा बदली सातत्याने होत असल्याने व सेवा निवृत्तीमुळे सद्यस्थितीला सुमारे २००० पदे रिक्त आहेत. दरवेळी परजिल्ह्यातील शिक्षकांची नेमणूक केली जाते, आणि ते शिक्षक ठराविक वर्षे नोकरी करून आपापल्या जिल्ह्यात निघून जातात. त्यामुळे शिक्षकांची जिल्हाबदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्या, अशी मागणी मागील १५ वर्षांपासून कोकणातील डीएड्, बीएड् धारक करत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपासून ते अगदी मुंबईपर्यंत येथील डीएड्, बीएड्धारकांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने केली. याद्वारे शासन दरबारी आपली व्यथा मांडली. आताही भरती प्रक्रीया करताना आॅनलाईन पध्दतीचा अवलंब केला जात आहे. यामध्ये भरतीसाठी पोर्टल उघडण्यात येणार असल्याने पुन्हा पर जिल्ह्यातील उमेदवार भरले जातील. यावर वेळीच रोख लावला गेला नाही तर अडचणी निर्माण होतील. सध्या उद्बवणारी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा बदली विरोधात ओस पडणाऱ्या कोकणातील शाळा वाचवण्यासाठी आता स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. गावागावातील लोकप्रतिनिधी, जाणकार नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत शाळा बचाओ आंदोलन सुरू केले आहे. पाठिंब्याची पत्रे कोकण डीएड्, बीएड् धारक असोसिएशनमार्फत शालेय शिक्षणमंत्र्यांना देण्यात येत आहेत. असोसिएशनकडे आलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पत्रात कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रूजू व्हायचे आणि काही वर्षानंतर आपापल्या जिल्ह्यात बदली करून निघून जायचे, या प्रकारामुळे जि. प. शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. नोकरीवर रुजू झाल्यानंतर परजिल्ह्यातील हे शिक्षक ग्रामीण भागात न राहता शहराच्या ठिकाणी राहतात. बहुतांश दिवस हे सलग सुट्ट्या घेण्यात जातात. काही दिवस शैक्षणिक कामाचे कारण सांगून तालुक्याच्या ठिकाणी वाया जातात. त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत शिकवायला शिक्षकच नसतात, अशी स्थिती आहे.
कोट
काही वर्षांपूर्वी शिक्षक भरती जिल्हा नियोजन मंडळाद्वारे जिल्हा स्तरावर होत होती. मात्र २०१० च्या आघाडी सरकारमधील शिक्षण मंत्र्यांनी ही भरती २०१० साली राज्यस्तरावर नेऊन ठेवली आणि भ्रष्टाचार बोकाळला. यात कोकणातील डीएड्, बीएड् धारक उद्ध्वस्त झाले. विदर्भ, मराठवाड्याच्या फायद्यासाठी कोकणचा बळी जातोय. त्यामुळे आता तरी सेना-भाजप सरकारने आमचे कोकण वाचवावे. अशी साद शाळा व्यवस्थापन समित्यांसह
डीएड्, बीएड् धारक संघटनेने घातली आहे.
- भाग्यश्री रेवडेकर, उपाध्यक्ष-कोकण डीएड्, बीएड्धारक संघटना