
मुंबईत खून करून रत्नागिरीत आश्रयाला आलेल्या दोघांना बेड्या
रत्नागिरी :मुंबईत एका महिलेचा खून करुन रत्नागिरीत आश्रय घेतलेल्या दोन संशयितांना रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघेही संशयित रत्नागिरीत बिनधास्त वावरत होते. या दोघांना ताब्यात घेताच आंबेशेत परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुंबईत खून करुन दोन आरोपी रत्नागिरीत आश्रयाला आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या टीमने रत्नागिरी शहर पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर रत्नागिरी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती. रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी तत्काळ आपली यंत्रणा कामाला लावली. संशयित आरोपींच्या शोधसाठी पथके तयार करण्यात आली. चौकशीदरम्यान दोन संशयित आंबेशेत येथील एका घरात आश्रयाला आले आहेत अशी माहिती उपलब्ध झाली. हे दोन्ही संशयित परिसरात बिनधास्त वावरत होते. नवीन चेहरे दिसत असल्यामुळे चर्चाही रंगली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी जावून दोघांनाही ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी घर मालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश साळुंखे, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, गणेश सावंत, विनय मलवाल, आशिष भालेकर यांनी केली.