
बारसूत जागा खरेदी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी – ना. सामंत
रत्नागिरी ः बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा केल्याचा (353) गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर बारसू ग्रामस्थांशी मुंबईत सविस्तर चर्चा केली जाईल. त्यातून योग्य तो मार्ग निघेल. असे सांगत बारसू येथे मोठ्या प्रमाणात जागा खरेदी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल अशी माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बारसू ग्रीन रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार विनायक राऊत जिल्हाधिकार एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, अजित यशवंतराव आदी मान्यवर उपस्थित होते.
बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित ग्रीन रिफायनरीसाठी जागा निश्चित करण्यात आली असली तरी माती परिक्षणाच्या अहवालानंतरच प्रकल्प उभारण्याबाबतचा निर्णय अंतिम होणार आहे. स्थानिक ग्रामस्थांनी माती परीक्षणाला विरोध दर्शवला आहे. शुक्रवारी पोलीस व आंदोलक आमनेसामने आले. त्यामुळे दोघांमध्ये थोडा संघर्ष झाला. परंतु लाठीचार्ज झालेला नाही असा दावा ना.उदय सामंत यांनी केला.
मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. बारसू येथील ग्रामस्थ माझेच आहेत. कोणावरही अन्याय केला जाणार नाही. दडपशाही केली जाणार नाही. स्थानिकांना विश्वासात घेऊन चर्चेतूनच मार्ग काढला जाणार असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले. या प्रकल्पाचे सादरीकरण खासदार शरदराव पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादरीकरण पाहिजे असेल तर त्यांची वेळ घेऊन त्यांना ते दिले जाईल असेही ना.सामंत यांनीही स्पष्ट केले.
बारसू सोलगाव येथे अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. महावितरणच्या एका अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती दोन ते तीन दिवसात याबाबतचा अहवाल देईल. त्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे ना.सामंत यांनी सांगितले.
राजकीय पक्ष आंदोलकांना पाठिंबा देतात इथपर्यंत समजू शकतो. परंतु येथील शेतकऱ्यांना काय करावे हे सांगायला बाहेरच्या लोकांच्या आवश्यकता नाही. आमचा निर्णय घ्यायला कोकणी जनता सक्षम आहे असा टोला ना.सामंत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना लगावला.
–
पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत काही निर्णय सकारात्मक झाले. परंतु थेट ग्रामस्थांशी आपण चर्चा करा. त्यातून जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असे आम्ही बैठकीत सांगितले आहे. ना.सामंत यांनी ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठक घेण्याचा आश्वासन दिले आहे. त्यांनी तात्काळ ही बैठक घेऊन ग्रामस्थांच्या शंका दूर कराव्यात असे मत खासदार विनायक राऊत यांनी बैठकीनंतर व्यक्त केले.