
खारघर येथील श्री सदस्यांच्या मृत्यूची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा: हुसेन दलवाई
रत्नागिरी :खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी भर दुपारी खुल्या मैदानात राज्य सरकारने सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या तीनशेहून अधिक श्री सदस्यांना उन्हाचा त्रास झाला तर सुमारे २० श्री सदस्यांचा हकनाक बळी गेला. हवामान खात्याने तीव्र उष्णतेचा इशारा दिलेला असताना, भर दुपारी सोहळा आयोजित करून राज्य सरकारने श्री सदस्यांचे प्राण घेतले आहेत. कोटयावधी रुपये खर्च केलेत, तर मग मंडप का उभारला नाही ? असा प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा, अशी मागणी माजी खासदार तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली. रत्नागिरी पत्रकारांशी ते बोलत होते.
नानासाहेब धर्माधिकारी यांचा वारसा आप्पासाहेब धर्माधिकारी उत्तमरीत्या चालवत आहेत. सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात त्यांचे काम उत्तम आहे. त्यांनी अनेक जणांना चांगला मार्ग दाखवला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे, परंतु आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या सोहळ्याचा वापर केला. त्यामुळेच 20 हून अधिक श्री सदस्यांना आपले प्राण गमवावे लागले. या सरकारमधील एकही मंत्री मृत श्री सदस्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी केला नाही. या सरकारच्या संवेदना संपल्या की काय? असा प्रश्न श्री दलवाई यांनी उपस्थित केला. पुरस्कार वितरण कार्यक्रमावर करोड रुपये खर्च करण्यात आले. मंत्र्यांना वातानुकूलित शामियाना होता. त्यामध्ये त्यांचे शाहीभोजन सुरू होते. याचवेळी रणरणत्या उन्हात श्री सदस्यांचा तळमळवून मृत्यू होत होता. परंतु संवेदनाहीन सरकारला तेथे उपाययोजना करता आल्या नाहीत. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केलात तर मग मंडप का उभारला नाहीत? आरोग्य सुविधा, पाणी का देता आले नाही? याचे उत्तर राज्य सरकारने दिले पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात श्री सदस्यांचे मृत्यू होणे ही गंभीर बाब आहे. या घटनेला जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी श्री. दलवाई यांनी केली.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सामाजिक काम खूपच मोठे आहे. मात्र आप्पांनी पुरस्कार स्वीकारते वेळी विचार करायला हवा होता. आपण पुरस्कार कोणाच्या हातून घेतो. यालाही फार महत्त्व आहे. महात्मा गांधी यांच्या खुनाचे समर्थन करणाऱ्यांचे हातून पुरस्कार घेतला गेला. याचे दुःख वाटते. आप्पा तुम्ही राजकारणी नाहीत, तुमचा मार्ग वेगळा आहे. पुरस्काराने तुम्ही मोठे होत नाही, कारण तुम्ही मोठेच आहात . ज्यांना मोठेपणा हवा आहे, तेच तुम्हाला पुरस्कार देतात असेही श्री. दलवाई यांनी आप्पा साहेब धर्माधिकारी यांना सुचविले आहे. चिपळूण मध्ये पुराचा धोका असल्याने वाशिष्टी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू होते. परंतु या कामाची गती आता मंदावली आहे. निधी संपला आहे. परंतु गाळ पूर्णतः काढण्यात यश आलेले नाही. तर जगबुडी खाडी जेथे वाशिष्टीला मिळते तेथे वाळूचा पट्टा तयार होतो. त्या ठिकाणचा गाळ काढण्याबरोबरच या दोन्ही खाड्या जिथपर्यंत समुद्राला मिळतात त्या भागातील गाळ काढला गेला पाहिजे. तर कोयनानगर धरणातील गाळ काढण्याची मागणी श्री. दलवाई यांनी केली. चिपळूण कराड रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी. तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण राहिलेले काम तात्काळ पूर्ण करा अशी मागणी त्यांनी केली. परशुराम घाटातील खोद कामामुळे भविष्यात मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब अभियंत्यांनी ही मान्य केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यामध्ये वेळेत लक्ष घालून मार्ग काढावा अशी सूचना श्री. दलवाई यांनी केली. तर आंबा बागायतरांना झाडामागे नुकसान भरपाई द्या. तर काजूला 160 रुपये हमीभाव देण्याची मागणी श्री. हुसेन दलवाई यांनी केली. यावेळी पत्रकार परिषदेला महिला प्रदेशच्या सरचिटणीस रूपाली सावंत, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष हरिष शेखासन, शहराध्यक्ष रमेश शहा, भरत लब्धे , सुरेश पात्रे पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते.