
वाटद कवठेवाडी शाळेचा सलग १५ तास वाचनवर्ग उपक्रम सर्वांसाठी आदर्शवत : अनिल पवार
सलग १५ तास वाचन करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनातून अभिवादन करणे, विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचनाची मानसिकता तयार व्हावी या हेतूने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला सलग पंधरा तास वाचनवर्ग हा उपक्रम सर्वांसाठीच आदर्शवत असल्याचे मत वाटद केंद्राचे केंद्रिय प्रमुख अनिल पवार यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित सलग १५ तास अभ्यासवर्ग उपक्रमाच्या वेळी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटावर मात करत अत्त्युच शिखर गाठले, तोच आदर्श विद्यार्थ्यांनी स्वीकारला पाहिजे. त्याची सुरुवात शाळेने राबविलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून व्हायला मदत होईल असा आशावाद व्यक्त केला.
या उपक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी उपक्रमाचे स्वरुप स्पष्ट केले तर शाळेचे उपशिक्षक गोविंद डुमनर यांनी आवश्यक सूचना दिल्या. या उपक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित असणारे आधुनिक शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते शंकर वरवटकर, अप्पा धनावडे, प्रभाकर धोपट, विलास बारगुडे, विश्वनाथ शिर्के, अनिल रेवाळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव कथन करत उपक्रमाच्या यशस्वीतेचे वर्णन केले.
या उपक्रमात शाळेचे आजी – माजी विद्यार्थी सहभागी होत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली व इतर पुस्तकांचे वाचन करत अभिवादन केले. मागील अनेक वर्षे शाळेच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सलग वाचन करत वैचारिक अभिवादन व्हावे यासाठी या उपक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच वयातच वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास बारगुडे, उपाध्यक्ष वैशाली कुर्टे, बालरक्षक विश्वनाथ शिर्के, संदीप धनावडे, सुवर्णा धनावडे, मनस्वी तांबटकर, यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती, शाळा जिर्णोद्धार समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, सर्व पालक आणि ग्रामस्थ यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच उपक्रमाच्या सुरुवातीला आणि समारोप प्रसंगी पालक व ग्रामस्थ यांची उपस्थिती मोठी होती.
या उपक्रमाचे नियोजन शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख अनिल पवार यांच्या निर्देशानुसार शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि उपशिक्षक गोविंद डुमनर यांनी केले.