
रत्नागिरीत आज स्वा.सावरकर गौरव यात्रेचे आयोजन
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम. श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नाम. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने रत्नागिरी शहरामध्ये शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून बुधवारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आज आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरी कारागृह येथून स्वा.सावरकर यात्रेची सुरवात होणार आहे. मुख्य रस्त्याने आंबेडकर पुतळा – जयस्तंभ – एस.टी.स्टँन्ड – राम आळी – गोखले नाका – सावरकर पुतळा -लक्ष्मीचौक असा या यात्रेचा मार्ग असणार आहे. यात्रा लक्ष्मी चौक येथे पोचल्यावर लक्ष्मीचौकामध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान लक्ष्मीचौक मैदानामध्ये स्वा.सावरकरांच्या गीतांचा व महाराष्ट्र स्फूर्ती गीतांचा “जयोस्तुते” हा कार्यक्रम होणार आहे.
सदर यात्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. श्री. उदयजी सामंत यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नेते सहभागी होणार आहेत. स्वा.सावरकरांवरील चित्ररथ, ढोलपथके याचबरोबर विविध मंदिरांचे विश्वस्त, विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्वा.सावरकर प्रेमी नागरिक यांच्यासह शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते अत्यंत उत्साहात या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.
रत्नागिरी ही तर स्वा.सावरकरांची कर्मभूमी ! इथल्या विशेष कारागृहातील कोठडीमध्ये कारावासही भोगला. दानशूर भागोजीशेठ किर यांनी बांधलेल्या पतित पावन मंदिरामध्ये सहभोजनाचा परिपाठ सुरू केला व हे मंदिर सर्वांसाठी खुले केले. यामुळे रत्नागिरीकरांसाठी स्वा.सावरकर आणि स्वा.सावरकरांचे विचार हे सदैव प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत. स्वा.सावरकरांच्या या कर्मभूमीमध्ये होत असलेल्या स्वा.सावरकर गौरव यात्रेमध्ये समस्त रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येन सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.राहूल पंडीत, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दिपक पटवर्धन आणि शिवसेना भाजपाच्या पदाधिका-यांनी केले आहे.