
शिक्षक भरतीकडे डीएड्, बीएड्धारकांच्या नजरा
रत्नागिरी:शिक्षक भरतीसाठी झालेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा (टीएआयटी) निकाल शुक्रवारी (ता. 24) जाहीर झाला. अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तिस हजार शिक्षकांची पदभरती व विभागीय स्तरावर भरती करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षात रिक्त पदे किती भरली जाणार याकडे डीएड्, बीएड्धारकांचे लक्ष लागले आहे.
राज्यात शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत, ती भरणार कधी या मुद्द्यांवरून अधिवेशनांमध्ये शिक्षणमंत्री केसरकर यांना अनेक लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना केसरकर यांनी सुमारे 30 हजार पदांची भरती करण्याची प्रक्रिया राबवण्याबाबत आश्वासन दिले. त्यानुसार परीक्षा परिषदेकडून आयबीपीएस कंपनीकडून 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने टीएआयटीची परीक्षा घेण्यात आली. राज्यातील 2 लाख 16 हजार 444 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आहे. आता निकालही लागला असून प्रत्यक्ष जागा किती भरणार, आणि विभागीय शिक्षक भरतीचा शासन निर्णय कधी निर्गमित होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 2017 मध्ये 24 हजार पदांची घोषणा केली. त्यानंतर सुमारे 12 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया झाली. प्रत्यक्षात मात्र साडेचार ते पाच हजार पदांची भरती झाली. अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. 5 वर्षे झाली तरी 2017 ची भरती अद्याप सुरूच आहे. आता मंत्री केसरकर यांनी घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी कशी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
यंदाच्या भरती परीक्षेत रिझनिंगवर (तर्क व अनुमान) मोठ्या प्रमाणात भर देण्यात आल्याने ही परीक्षा शिक्षकांसाठी आहे की बँकेच्या अधिकार्यांसाठी आहे असा प्रश्न उमेदवारांतून करण्यात येत होता. कला शाखेतील विद्यार्थ्यांनी तर परीक्षेनंतर संताप व्यक्त केला. 2 तासांमध्ये 200 प्रश्न विचारण्यात आले होते. निकाल लागल्यानंतर उमेदवारांनी एकमेकांचे गुण तपासले असता 90 ते 120 पर्यंत गुण असणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जागा किती उपलब्ध होणार त्यानुसार मेरिट ठरणार आहे. तरीही मेरिट किती लागणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. 2017 साली सरासरी 130 पेक्षा जास्त गुण असणार्यांची निवड झाली होती. यंदा गुणांची सरासरी कमी झाली आहे.