रत्नागिरीत नागरी प्रश्न, कामगार दुर्घटनेप्रकरणी ठाकरे सेना आक्रमक
मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर
रत्नागिरी :
शहरातील बिकट होत चाललेल्या नागरी समस्या आणि सुरक्षेच्या अभावी कंत्राटी स्वच्छता कामगाराचा झालेला मृत्यू या दोन गंभीर विषयांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. मोकाट कुत्रे, गुरे आणि रस्त्यांच्या साईड पट्ट्यांच्या दुरवस्थेप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली, तर दुसरीकडे सुरक्षेशिवाय काम करायला लावल्यामुळे सर्पदंशाने झालेल्या कामगाराच्या मृत्यू प्रकरणी प्रशासनाला व ठेकेदाराला धारेवर धरत कठोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शहर आणि परिसरातील वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शहरातील रस्त्यांच्या साईड पट्ट्यांची झालेली दुरवस्था आणि अपूर्ण कामांमुळे अपघातांचा धोका वाढल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
यासोबतच, शहरात दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला मोकाट कुत्रे आणि गुरांचा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी होता. मोकाट कुत्र्यांमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये भीतीचे वातावरण असून, रस्त्यांवर फिरणाऱ्या गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावर नगर परिषदेने तात्काळ विशेष मोहीम हाती घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर नगरपरिषदेच्या उद्यान विभागांतर्गत स्वच्छता करत असताना सर्पदंश होऊन फगरवठार येथील ५२ वर्षीय कंत्राटी कामगार काशीनाथ काशीनाथ गोताड यांचा झालेला मृत्यू अत्यंत संतापजनक आहे. हा अपघात नसून नगरपरिषद उद्यान विभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे झालेली हत्या आहे, असा घायघोडा आरोप शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केला आहे.
व्ही.आय.पी. दौऱ्याच्या नावाखाली घाईघाईने काम करून घेताना कंत्राटी कामगारांना साधे गमबूट किंवा आवश्यक सुरक्षा कीट न पुरवल्यामुळे अवघ्या २० दिवसांपूर्वी कामावर लागलेल्या निष्पाप कामगाराला आपला जीव गमवावा लागला. मृत काशीनाथ गोताड हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
पीडित कुटुंबाला प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने तत्काळ सन्मानजनक व मोठी आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.
कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी एका पात्र सदस्याला रत्नागिरी नगरपालिकेत त्वरित कंत्राटी तत्त्वावर शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. कंत्राटी कामगाराचा अपघात विमा उतरवला होता का याची शहानिशा करावी; विमा नसल्यास विम्याच्या समतुल्य रक्कम ठेकेदाराकडून वसूल करून ती पीडित कुटुंबाला देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने या मागण्यांवर संवेदनशीलतेने तात्काळ निर्णय न घेतल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
या बैठकीस शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, विभागप्रमुख साजिद पावसकर, प्रशांत सुर्वे, राजाराम रहाटे, सुफियान जयगडकर, राजेंद्र सुर्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.