‘लोकअदालत’मध्ये ल् एकाच दिवसात ४ हजार ३२६ प्रकरणांचा निपटारा
रत्नागिरी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, रत्नागिरी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय लोकअदालती’ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशा एकूण ४,३२६ प्रकरणांचा सामोपचाराने यशस्वी निपटारा करण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद वाय. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली.
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील यांनी या मोहिमेच्या यशाची माहिती दिली. लोकअदालतीसमोर जिल्ह्यातील न्यायालयांमधील प्रलंबित आणि दाखलपूर्व अशी हजारो प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
या लोकअदालतीसमोर एकूण ३,८७२ प्रलंबित प्रकरणांपैकी १५२ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. १५,३४० वाद दाखलपूर्व प्रकरणांपैकी तब्बल ४,१७४ प्रकरणांमध्ये सामोपचाराने तोडगा काढण्यात आला.
या लोकअदालतीमध्ये विविध प्रकारच्या प्रकरणांवर चर्चा होऊन ती मिटवण्यात आली, ज्यात प्रामुख्याने दिवाणी दावे आणि तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेश आणि वैवाहिक वादाची प्रकरणे, बँका, पतसंस्थांची वसुली प्रकरणे, थकीत वीज बिल आणि टेलिफोन बिल संबंधित वाद या प्रकरणांचा समावेश आहे.
या लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, सर्व तालुका विधी सेवा समितीचे न्यायाधीश, विधीज्ञ आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामोपचाराने वाद मिटवल्यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचला असून, न्यायालयीन कामकाजाचा ताणही हलका होण्यास मदत झाली आहे.