जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वात भाजपा स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात विविध सामाजिक, संघटनात्मक व जनसंपर्क उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.
या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा पातळीवरील समिती जाहीर करण्यात आली असून त्यात सौ. वर्षा ढेकणे (महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष), सुहास उर्फ राजू भाटलेकर (संयोजक), संदीप नाचणकर (सहसंयोजक), योगेश शिर्के (सहसंयोजक) आणि सौ. शीतल पटेल (सहसंयोजक) यांचा समावेश आहे.
भाजपा हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्राने पक्ष कार्यरत असल्याचे प्रसिद्धी पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थापना दिन साजरा होणार आहे.
येत्या ५ ते ७ एप्रिलदरम्यान सर्व मंडळ व जिल्हा कार्यालयांवर सजावट व रोषणाई करण्यात येणार आहे. ६ एप्रिल रोजी सर्व पक्ष कार्यालयांमध्ये ध्वजारोहण, मिठाई वाटप तसेच पक्षाचा इतिहास व विकासकामांची माहिती देण्यात येईल. ५ ते १२ एप्रिलदरम्यान कार्यकर्त्यांनी घरावर पक्षध्वज फडकावून समाजमाध्यमांतून प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या ८ व ९ एप्रिल रोजी मंडळ स्तरावर सक्रिय कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात येणार असून संघटनात्मक विस्तार, निवडणूक यश आणि केंद्र सरकारच्या कामगिरीवर चर्चा होणार आहे. ७ ते १२ एप्रिलदरम्यान ‘गाव/वस्ती अभियान’ राबवून स्वच्छता उपक्रम, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.