शहराचा पाणीप्रश्न सुटला; धरणात मुबलक साठा उपलब्ध
नगरपरिषदेचे पाणी सभापती निमेश नायर यांनी दिली माहिती
रत्नागिरी:-
उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असताना रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा भासणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
वाढत्या तापमानामुळे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आज शीळ धरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे श्री. पवार, श्री. चाळके आणि सिंचन विभागाचे धामापूरकर साहेब उपस्थित होते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली.
बुधवार १ एप्रिल रोजी शील धरणातील पाणी पातळी ११६.५ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. रत्नागिरी शहराला दररोज साधारण २० एम.एल.डी. पाण्याची गरज असते. सद्यस्थितीतील साठा पाहता, पुढील किमान ७० दिवस शहराला नियमित पाणीपुरवठा होऊ शकेल इतका मुबलक साठा धरणात उपलब्ध आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात ‘एक दिवस आड’ पाणीपुरवठा होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, पाहणीनंतर या अफवांना पूर्णविराम देण्यात आला आहे. एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यात नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार असून, सध्या तरी पाणी कपातीचे कोणतेही नियोजन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.