दापोली हर्णैत मोबाईल नेटवर्कचा बोजवारा
१२ हजार लोकसंख्या अन् पर्यटकांचीही प्रचंड गैरसोय
दापोली ः तालुक्यातील हर्णै किनारी गावातील मोबाईल नेटवर्कचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सुमारे १२ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात मोबाईल सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नेटवर्क अत्यंत अस्थिर असल्याची तक्रार आहे. याबाबत ग्रामस्थांसह पर्यटकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
विशेषतः बीएसएनएलची सेवा दिवसातून तब्बल १२ ते १४ तास पूर्णपणे खंडित राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, डॉक्टर किंवा नातेवाईकांशी संपर्क साधणे कठीण ठरत आहे. ऑनलाइन व्यवहार, शैक्षणिक उपक्रम आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित कामकाजालाही मोठा फटका बसतो. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी अनेक वेळा संपर्क साधण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. बीएसएनएलचे दापोली कार्यालयातील अधिकारी विजय मीना यांच्याशी संपर्क करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रत्नागिरीतील बीएसएनएलच्या उपमहाव्यवस्थापक अमृता लेले यांच्याशीही वारंवार संपर्क साधण्यात आला; मात्र समस्येवर ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यटकांचीही गैरसोय होत आहे.
कोट
गावातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल जातो; पण मूलभूत सुविधा मिळत नाहीत. मोबाईल रेंज नसल्याने नागरिक अक्षरशः वेठीस धरले गेले आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
—भास्कर जोशी, पुजारी, संत एकनाथ देवस्थान
कोट
मुलांच्या ऑनलाइन शिक्षण वारंवार खंडित होते. बँकेचे व्यवहार करणेही अवघड झाले आहे. नेटवर्क नसल्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. समस्या सोडवली नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
–सुरेश चोपडे, सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघ.