मांडकी येथे राज्यातील पहिल्या ग्रामिण, कृषी- सहकार मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन
चिपळूण ः कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. त्याचं आपणच आपल्या पद्धतीने विविध स्तरावर सादरीकरण केले पाहिजे. विशेषतः साहित्यीकांनीही कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखान करायला हवे. कोकणच्या तुलनेत कॅलीफोर्निया हा केवळ दहा टक्केच आहे. कोकण हे निसर्ग आहे, तर कॅलिफोर्नियामध्ये कृत्रीमता आहे. त्यामुळे कोकणातील निसर्ग टिकवूया, असे आवाहन मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे केले.
डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने तालुक्यातील मांडकी पालवण येथे आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या ग्रामिण कृषी, सहकार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी मराठी भाषा मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, बॅरिष्टर नाथ पै यांनी आखलेल्या मार्गावरून आपला प्रवास सुरू आहे. कोकण रेल्वेचे निर्माते मधू दंडवते यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला दिले. तर चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव रत्नागितील उपकेंद्राला दिले. कोकण सुपुत्रांचा आपणच आपल्या पद्धतीने सन्मान केला आहे. विश्व मराठी साहित्य संमेलन यावर्षी नाशिक येथे होत आहे. कुसुमांग्रजांचे हे गाव आहे. जगभरातील मराठी भाषीक येथे यावेत, हा यामागचा उद्देश आहे. सिमा भागातील मराठी ग्रंथालयांना शासनाने अनुदान दिले. त्यातून अनेक वाचनालये उभी राहत आहेत. मतृभाषा टिकण्यासाठी अशा संमेलनांची आवश्यकता आहे. ही संमेलने केवळ चर्चेपुरती रहायला नकोत. यातून शासनाला मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे. साहित्य संमेलनात नेहमीच राजकारण्यांवर टिका केली जाते. मात्र राजकारणात देखील कलाकारांची काही कमी नाही. काही राजकारणी २४ तास मेकअप लावूनच असतात. पदमश्री पोपट पवार यांना उद्देशून म्हणाले, ज्याप्रमाणे पोपटराव परावांनी गावांचा विकास केला. तशी जिल्ह्यातील पाच मतदार संघातील प्रत्येकी दोन याप्रमाणे १० गावे आदर्श गावांसाठी निवडू. त्यांना पोपटराव पवारांनी मार्गदर्शन करावे.
कोकण कृषी विद्यापीठ बाबत म्हणाले, कृषी विद्यापीठे हे संशोधनाची केंद्रे बनली पाहिजेत. येथून शास्त्रज्ञ घडले पाहिजेत. जेणेकरून शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत होईल. लागलेली किड त्याच वर्षी गेली पाहिजे, अशी कोपरखळी देखील मारली. कृषी विद्यापीठांमध्ये सुमारे २५ हजार एक जागा पडीक आहेत, त्यांचा संसोधनासाठी वापर व्हायला हवा. मराठी भाषा ही जगातील प्रगत भाषा आहे. महाराष्ट्रात केवळ मराठीचीच सक्ती राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले, शासनाच्या सहकार्यामुळे राज्यातील पहिले ग्रामिण साहित्य संमेलन येथे होऊ शकले. साहित्यीकांनी नेहमीच सकारात्मकता मांडायला हवी. भाषा आणि समाजा-समाजात वाद, विद्धंस होईल, असे लिखान करू नये. बोलीभाषा टिकण्यासाठी व मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी सर्वांनीच योगदान द्यायला हवे. स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. संजय भावे म्हणाले, जगात शेती आणि शिक्षण हेच शाश्वत आहे. अलिकडच्या ग्रामिण लेखनामध्ये शेती, संशोधन समस्या येत नाहीत. त्यामुळे साहित्यीकांनी यााकडे लक्ष दिले पाहिजे. यानिमीत्त डॉ. तानाजी चोरगे लिखीत आंदोलन या पुस्तकाचे तसेच स्मरणीचे प्रकाशन करण्यात आले. सुत्रसंचालन संजय शुस्कुटे तर आभार अरूण इंगवले यांनी मानले.
यावेळी पदमश्री पोपटराव पवार, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिल्पा सुर्वे, समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखील चोरगे, बाबाजी जाधव, जयवंत जालगांवकर, अजय चव्हाण, सागर देशपांडे, डॉ. राजन गवस आदी उपस्थित होते.