रत्नागिरी – नागपूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार
देवरूख : रत्नागिरी–नागपूर महामार्गावरील करंजरी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. महामार्गावर पडलेल्या मृत सांबराची माहिती मिळताच वनविभागाने त्वरित हालचाली सुरू केल्या.
परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल सागर गोसावी यांच्यासह दाभोळेच्या वनरक्षक सुप्रिया काळे, साखरपाचे सहाय्यक वनरक्षक सहयोग कराडे, फुणगूसचे आकाश कडुकर आणि आरवलीचे सुरज तेली यांनी घटनास्थळी भेट देत मृत पशूची पाहणी केली. त्यानंतर आवश्यक पंचनामा करून पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
सदर अपघातात धडक देणारे वाहन अद्याप अज्ञात असून, संबंधित चालकाचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. वन्यप्राणी संरक्षणाच्या दृष्टीने महामार्गांवर वेगमर्यादा पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.