वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता अत्याधुनिक कार लक्ष ठेवणार
रत्नागिरीच्या वाहतूक शाखेसाठी ‘स्पीड गन कार’ दाखल
रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या वतीने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक शाखेसाठी अत्याधुनिक ‘स्पीड गन कार’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यावर आणि अतिवेगवान वाहन चालकांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आता शक्य होणार आहे.
शनिवार, दि. १५/११/२०२५ रोजी या महत्त्वपूर्ण वाहनाचे लोकार्पण रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
वाहतूक सुरक्षेला मिळणार नवी दिशा
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर आणि विशेषतः वेगाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता ही अत्याधुनिक कार लक्ष ठेवणार आहे. ‘स्पीड गन’ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या वाहनामुळे वाहतूक पोलिसांना अचूकपणे वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे सुलभ होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती राधिका फडके (गृह), पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. निलेश माईणकर, अन्य पोलीस अधिकारी तसेच वाहतूक शाखेचे अंमलदार उपस्थित होते.
श्री. नितीन बगाटे यांनी यावेळी बोलताना, रत्नागिरीच्या नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि रस्ते अपघात कमी करण्याच्या या प्रयत्नात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केले.