भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा राजीनामा
रत्नागिरी : भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी तो प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाधीन केला आहे. सावंत यांच्या या अचानक निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंत यांच्या मुलीला रत्नागिरी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे. विशेष म्हणजे, राजेश सावंत यांच्या मुलीचे लग्न उबाठा सेनेचे नेते बाळ माने यांच्या मुलाशी झाले आहे. त्यामुळे उबाठा सेनेकडून बाळ माने यांच्या सुनेला म्हणजेच राजेश सावंत यांच्या मुलीला नगराध्यक्षपदासाठी तिकीट दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर हितसंबंध टाळण्यासाठीच सावंत यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात असून, त्यांनी आज चिपळूण येथे झालेल्या बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी भाजपच्या अंतर्गत समीकरणांवर चर्चेची नवीन लाट निर्माण झाली आहे.